नवी दिल्ली – भारतात करोनाच्या धोक्याने पुन्हा थैमान घातल्याने आगामी स्पर्धांच्या आयोजनावरून बीसीसीआयदेखील चिंतेत आहे. त्याचमुळे या सगळ्यांबाबत विचारविनिमय करून निर्णय घेण्यासाठी सर्व राज्य संघटना तसेच सर्व सदस्यांसह एक विशेष बैठक बोलावण्यात आली आहे.
भारतात टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा होणार आहे. येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. याबाबत काही निर्णय घेण्यासाठी बीसीसीआयने 29 मे रोजी ही बैठक बोलावली आहे. या स्पर्धेसह देशांतर्गत क्रिकेटबाबतही चर्चा केली जाणार आहे. करोनाचा धोका लक्षात घेऊन आगामी स्थानिक क्रिकेट स्पर्धांबाबतही चर्चा करण्यासाठी ही बैठक होणार आहे.
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी राज्य क्रिकेट संघटनांना याचे निमंत्रण व पत्र पाठवले आहे. गेल्या वर्षी रणजी स्पर्धा खेळवण्यात न आल्याने बीसीसीआय यावर्षी सप्टेंबरपासून देशांतर्गत स्पर्धा सुरू करण्याचा विचार करीत आहे.
2020-21 सालच्या मोसमात विजय हजारे एकदिवसीय स्पर्धा, तसेच सय्यद मुश्ताक अली टी-20 करंडक या मर्यादित षटकांच्या स्पर्धा खेळवण्यात आल्या होत्या. नव्या मोसमाची सुरुवात सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेने करण्यावर आता भर देण्यात येणार आहे.