मुंबई – शरद पवारांच्या राजकारणाबद्दल बोलताना सुळे म्हणाल्या, ५५ वर्षातील राजकारणातील २७ वर्षे सत्तेतील आणि २७ वर्षे विरोधातील पण महाराष्ट्राने पवार साहेबांना प्रचंड प्रेम दिल विरोधात असल्यावर तर जास्त प्रेम दिल. विरोधात गेल्यानंतर शरद पवार दौऱ्यावर निघतात आणि त्या दौऱ्यामध्ये काय गम्मत होते हे माहित नाही परंतु दौरा झाल्यानंतर ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात असंही सुप्रिया सुळे यांनी यावेळी नमूद केलं.
कोणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं की महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येईल. रोज सकाळी आम्ही उठलो की पाहायचो की पक्ष सोडून कोण गेला. इतके लोक पक्ष सोडून जात होते की त्याला काही हिशोब नव्हता असंही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.
सुप्रिया सुळेंच्या या विधानावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकरांशी बोलताना पलटवार केला आहे. ते म्हणाले,“तो काळ गेला आहे. शरद पवारांचं नाव आणि काम वापरून तुम्ही किती दिवस मोठे व्हाल? स्वत:चं कर्तृत्वही दाखवावं लागेल. शरद पवारांनी त्यांच्या आयुष्यात काम केलं आहे. पण त्यांच्या कामावर दुसरे तरून जातील असा काळ आता गेला आहे. जो पदावर आहे, तो किती काम करतो हे पाहिलं जातं. आता जनता तर बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर अशा विचाराची आहे”, असं बावनकुळे म्हणाले.