इतर राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत. मात्र, सर्वांना उत्सुकता लागली आहे ती महाराष्ट्राची.उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळणार की तरणार? कारण भाजपने गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.
मुख्यमंत्री या नात्याने उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राची धुरा हाती घेतली तेव्हापासून कोणत्या ना कोणत्या कारणाने महाराष्ट्र राजकीयदृष्ट्या अस्वस्थ आहे. आता ही अस्वस्थता नैसर्गिक आहे की बनावट, हे सांगता येणार नाही. कारण तो संशोधनाचा विषय आहे. मात्र, ज्या प्रकारच्या घडामोडी घडत आहेत त्यामुळे अनेक शंका-कुशंका निर्माण झाल्या आहेत.
केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात सुरुवातीपासूनच तू-तू-मैं-मैं सुरू आहे. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून शिवसेनेने तटस्थ भूमिका घेतल्यापासूनच केंद्र आणि राज्यात उंदीर-मांजराची लढाई सुरू आहे. सत्ताप्राप्ती हेच राजकारण करण्याचे अंतिम ध्येय आहे, हे सत्य मान्य केले तरी यात सामान्य जनतेचे हाल होणार नाही, याची काळजी घेतली गेली पाहिजे. सध्या ही काळजी घेतली जात आहे असे दिसून येत नाही. सध्या जो संघर्ष केंद्र आणि राज्यामध्ये निर्माण झाला आहे तो करोनाबाधितांची वाढती संख्या आणि लसीचा पुरवठा या मुद्द्यावरून. महाराष्ट्रात करोनाबाधितांची संख्या ही सापशिडीतील खेळाप्रमाणे झपाट्याने वाढत आहे.
अशात, लसीची टंचाई निर्माण झाली आहे. मोदी सरकार लसीचा पुरवठा करण्यात जाणीवपूर्वक विलंब करीत आहे, असा ठाकरे सरकारचा आरोप आहे, तर करोना व्हायरसच्या मुसक्या आवळण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप केंद्राने राज्य सरकारवर केला आहे. महाराष्ट्र सरकार आपलं अपयश लपविण्यासाठी राजकारण करीत आहे. केंद्रावर आरोप करीत आहे. यापेक्षा राज्य सरकारने लोकांच्या आरोग्याची काळजी करावी, असा भाजप नेत्यांचा सल्ला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन आणि माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्र सरकारवर घणाघाती हल्ला केला आहे. चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीतील आणखी एका नेत्याची विकेट जाणार असल्याचा दावा केला आहे. खरं म्हणजे, महाराष्ट्र सरकार चक्रव्युहात सापडले की काय, अशी शंका निर्माण होत आहे. सचिन वाझे प्रकरण, परमबीर सिंह प्रकरण, अनिल देशमुख यांचा राजीनामा आणि करोनाची वाढती संख्या अशा चौफेर संकटात उद्धव ठाकरे यांचे सरकार सापडले आहे. या सर्व गोष्टींची परिणती नेमकी कशात होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कारण, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली आहे, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी अलीकडेच केले होते. शिवाय, विरोधी पक्षनेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याजवळ साडेसहा जीबीचा डाटा आहे आणि यात बरीच स्फोटक माहिती आहे. या सहा जीबीच्या “डेटोनेटर’मध्ये नेमके कोणते “बारूद’ आहे, हे आता या डाटाचा स्फोट होईल तेव्हाच कळेल. एक मात्र नक्की की, त्यात ठाकरे सरकारला हादरे बसतील, असंच काही तरी असावं.
दुसरीकडे, सध्या निवडणुका सुरू असलेल्या राज्यांमध्ये भाजप सरकार स्थापन करण्याच्या कामाला लागला आहे, याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. आसाममध्ये मुख्य लढत आहे ती भाजप आणि कॉंग्रेसमध्ये. कॉंग्रेसचे उमेदवार विजयाचा दावा करीत आहेत आणि याच उमेदवारांवर भाजपची नजर पडली आहे. कदाचित म्हणूनच की काय, आपले भावी आमदार पक्ष बदलू शकतात किंवा पक्ष बदलण्यासाठी त्यांना बाध्य केले जाऊ शकते, याची चाहूल लागताच कॉंग्रेसने आपल्या 20 उमेदवारांना जयपूर येथे सुरक्षितस्थळी हलविले आहे. राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांचे सरकार आहे, हे येथे उल्लेखनीय.
ज्या उमेदवारांना जयपूरला हलविण्यात आले आहेत ते जिंकणारे उमेदवार आहेत. यात सर्वाधिक बदरूद्दीन अजमल यांच्या एआययूडीएफ पक्षाचे उमेदवार आहेत. आघाडीच्या उमेदवारांनाही सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम सुरू आहे. कारण, निकालानंतर मोठा प्रमाणावर घोडाबाजार होईल अशी भीती कॉंग्रेसच्या मनात निर्माण झाली आहे.
दुसरीकडे, भाजपचेच नेते हेमंता बिस्वा सरमा यांच्यावर करडी नजर आहे. कारण, भाजपला आसाममध्ये पूर्ण बहुमत मिळाले तर आपले मुख्यमंत्रिपद गेल्याशिवाय राहणार नाही, असे सरमा यांना वाटत आहे. यामुळे भाजपला पूर्ण बहुमत मिळू नये अशी त्यांची इच्छा आहे. आसाममध्ये त्रिशंकू विधानसभा यायला हवी असे हेमंता यांची इच्छा आहे. त्रिशंकू विधानसभा आली तर मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते, असे त्यांना वाटते. असे यापूर्वी घडले आहे म्हणून ते ताकसुद्धा फुंकून पित आहेत. भजनलाल हे हरियाणा कॉंग्रेसचे अध्यक्ष होते आणि त्यांच्याच नेतृत्वात विधानसभेची निवडणूक लढविण्यात आली होती. मात्र, कॉंग्रेसने निवडणूक जिंकली आणि सोनिया गांधी यांनी भूपेंदरसिंग हुडा यांना मुख्यमंत्री बनविले होते.
खरं सांगायचे म्हणजे, निवडणुकीच्या निकालानंतर मोठ्या प्रमाणावर घोडाबाजार होण्याची भीती फक्त कॉंग्रेसलाच वाटते असे नव्हे तर सर्व विरोधी पक्षांचे असेच मत आहे. विशेषतः मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भीती मोठी आहे. कारण, तृणमूल कॉंग्रेस आणि यूडीएफचे कोणते उमेदवार फुटू शकतात याची भाजपला पूर्ण माहिती आहे. हीच भीती केरळमध्येसुद्धा निर्माण झाली आहे. शिवाय, भारतीय जनता पक्षाकडून अशाप्रकारची खेळी खेळली जात असल्याचा जुना इतिहाससुद्धा आहे.