सातारा – रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री त्यांच्या मूळ सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी बारसू ग्रीन रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन केले. महाविकास आघाडीने या प्रकल्पाला अचानक कसा विरोध सुरू केला यावर त्यांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले.
उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्राचा दाखला शिंदे यांनी दिला. विकासाच्या हितासाठी कोकणात रिफायनरी उभारण्याची विनंती करताना मुख्यमंत्री म्हणाले की, या प्रकल्पामुळे स्थानिकांसाठी रोजगाराचे नवीन मार्ग खुले होतील. तसेच या प्रकल्पामुळे कोकणात कोट्यावधी रूपयांची गुंतवणूक येणार आहे.
शिंदे म्हणाले की, नाणार प्रकल्प रद्द झाल्यानंतर तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच बारसू येथे प्रकल्पाची जागा सुचवली होती व बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी पंतप्रधान मोदींना पत्रही लिहिले होते. एवढं झाल्यावर आता बारसूला विरोध का होतोय हे समजणं अवघड आहे, हा संशोधनाचा विषय आहे, असं ते म्हणाले. ते म्हणाले की समृद्धी महामार्गाच्या उभारणीलाहीं असाच विरोध झाला होता. परंतु हा विरोध डावलून हा प्रकल्प सुरूच ठेवण्यात आला होता.
आता हा प्रकल्प राज्यासाठी गेमचेंजर ठरला आहे ही बाबही बारसुला विरोध करणाऱ्यांनी ध्यानात ठेवायला हवी असे ते म्हणाले. हा केवळ विरोधासाठी विरोध आहे. सध्या प्रकल्पासाठी माती परीक्षण केले जात आहे. माती परीक्षण अहवालाचे मूल्यांकन केल्यानंतरच प्रकल्प सुरू होईल, कारण या स्वरूपाच्या प्रकल्पासाठी जमीन योग्य आहे की नाही हे आधी निश्चीत करावे लागेल असे ते म्हणाले. मात्र, स्थानिकांच्या संमतीशिवाय एक वीटही रचली जाणार नाही, अशी ग्वाहीहीं त्यांनी दिली.