मोरगाव : बारामती तालुक्यातील तरडोली येथील पाझर तलाव (आज दि. 9) सकाळी पूर्ण क्षमतेने भरला आहे. यामुळे या तलवावर अवलंबून असलेल्या पाच गावांच्या विहीर नळ पाणी योजना पुन्हा कार्यान्वित होणार असून परिसरातील शेकडो हेक्टर शेतजमीनीला सिंचनाला याचा फायदा होणार आहे.
तरडोली (ता. बारामती) येथील पाझर तलावावर तरडोली, मासाळवाडी, माळवाडी, बाबुर्डी, मोरगाव (काही भाग) या गावांच्या पिण्याच्या नळ पाणी योजना अवलंबून आहेत. नाझरे धरण क्षेत्र , मोरगावसह परीसरात सातत्याने होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पाझर तलाव पुर्ण क्षमतेने भरला आहे . तसेच सांडव्यावरुन पाणी वाहण्यास सुरवात झाली असून तब्बल दोन वर्षांनी तलाव भरला आहे.
तलावातील पाण्याचे जलपूजन आज जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच विद्या भापकर, सोमेश्वर कारखान्याचे संचालक किसन तांबे, माजी सरपंच नवनाथ जगदाळे, उपसरपंच महेंद्र तांबे, ग्रामपंचायत सदस्य संतोष चौधरी, संजय भापकर दत्तात्रय पुणेकर , सतीश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
पावसामुळे तलाव भरला असल्याने तरडोलीसह परीसरातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. तसेच तलावामुळे परीसरातील विहरींची पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे . या परिसरातील कमी झालेले ऊसाचे क्षेत्र पुन्हा वाढण्यास मदत होणार आहे. यामुळे या भागातील शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त होत आहे .