दोन हजारांहून अधिक रुग्ण आढळूनही उपाययोजना तोकड्याच
मुकुंद ढोबळे
शिरूर-पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यात करोना बाधितांची संख्या 2000च्या वर गेली तर शंभरच्या जवळपास नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हा दखल घेणारा विषय नाही का? बारामतीपेक्षा जास्त रुग्ण शिरूर तालुक्यात आढळलेत मग इथे लॉकडाऊन नाही का? असा सवाल शिरूरकरांनी विचारला आहे.
शिरूर तालुक्यातील औद्योगिक वसाहत काही दिवस तरी बंद ठेवा अन्यथा शिरूर तालुक्यात करोनाचा कहर होईल. मग ठोस कार्यक्रम राबवून सुद्धा उपयोग होणार नाही. सध्या शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात करोनाचा कहर होत असून याला जबाबदार या भागात असणारी औद्योगिक वसाहत असून गेल्या अनेक दिवसांपासून या औद्योगिक वसाहतींमुळे शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोणाचा फायदा झाला आहे.
याबाबत अनेक वेळा वर्तमान पत्रात बातम्या येऊनही याकडे जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, आपत्ती व्यवस्थापन, या सर्वांनी औद्योगिक वसाहतीला प्राधान्य दिले; परंतु औद्योगिकीकरण टिकले पाहिजे हे तुमचे बरोबर आहे. पण आमचे लोकही जगले पाहिजेत. हॉटस्पॉटमधून येणाऱ्या अधिकारी, कामगार यांच्याकडे लक्ष ठेवणे गरजेचे होते; परंतु कंपनी व्यवस्थापन आणि शासकीय प्रशासन या सर्वांनी त्याकडे डोळेझाकपणा केला आणि त्याचे परिणाम शिरूर तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी जनतेला भोगावे लागले. याला जवाबदार कोण? आजही मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत आणि त्याच्या जवळची गावे बाधित होत असताना याकडे कोणाचे लक्ष वेधले नाही.
शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात करोनाचे रुग्ण आढळत असताना रुग्णही मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडत आहे. परंतु याचा योग्य अहवाल किंवा माहिती शासनापर्यंत पोहोचत नाही. गोरगरीब जनतेला खासगी रुग्णालयात प्रवेश नाही. या सर्वांमुळे जनता मेटाकुटीला आली आहे. यापुढील काळात मोठ्या प्रमाणात रुग्ण निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे; परंतु अजूनही आपण डोळेझाकपणा करीत आहे हे चुकीचे आहे.