33 लाख शेतकऱ्यांचे “केसीसी’साठी अर्ज; 2 लाख जणांनाच वाटप
पुणे – 33 लाखांहून जास्त शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्डसाठी (केसीसी) अर्ज केले. मात्र, बॅंकांनी फक्त 2 लाख जणांनाच या कार्डद्वारे कर्ज वाटप केले. पीक कर्जवाटप सूलभ होण्यासाठी “केसीसी’ योजना राबवत आहे. मात्र, बॅंकांच्या कामात उदासीनता आहे.
पीएम किसान योजनेअंतर्गत केसीसी दिल्यास शेतकऱ्याला 3 लाखांपर्यंतचे कर्ज व इतर लाभ मिळू शकतात. कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, केवळ कार्ड वाटून थांबायचे नसून खरिपासाठी केसीसी कार्डधारक शेतकऱ्याला प्राधान्याने कर्जपुरवठा करायचा आहे. मात्र, ही सर्व प्रक्रिया बॅंकांच्या पातळीवरची आहे. बॅंका ही जबाबदारी पार पाडत नसल्यास सहकार खात्याने जाब विचारायला हवा. याचा कृषी विभागाशी काहीही संबंध नाही.
सहकार विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, राज्यात पीएम किसान योजनेत 85 लाख शेतकरी सहभागी झाले आहेत. त्यातील 33 लाख 50 हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना केसीसी तत्काळ देता येऊ शकते. त्यासाठी बॅंकांकडे अर्जदेखील आलेले आहेत.
…बॅंकेची जबाबदारी
शेतकऱ्याने अर्ज केलेला असल्यास तो मंजूर करून त्याला कर्ज रक्कम देण्याची जबाबदारी बॅंकेचीच आहे. अर्जात काही त्रुटी असल्यास तो नामंजूर करून संबंधित शेतकऱ्याला कळविण्याची देखील जबाबदारी बॅंकेकडे जाते.