चेन्नई -अखेरच्या चेंडूपर्यंत रोमहर्षक ठरलेल्या सामन्यात रॉय चॅलेंजर बेंगळुरूने मुंबई इंडियन्सचा 2 गडी राखून पराभव केला व शुक्रवारपासून सुरू झालेल्या आयपीएल स्पर्धेत विजयी सलामी दिली.
मुंबईने विजयासाठी दिलेल्या 160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगळुरूने थाटात सुरुवात केली होती. मात्र, कर्णधार विराट कोहली बाद झाल्यावर त्यांचा डाव अडचणीत आला होता. त्यानंतर एबी डीविलियर्स व ग्लेन मॅक्सवेल यांनी आक्रमक फलंदाजी करत सामना बेंगळुरूच्या बाजूने फिरवला होता. त्याचवेळी डीविलियर्स धावबाद झाला तर त्यापूर्वी मॅक्सवेलही परतल्याने त्यांचा डाव पुन्हा एकदा संकटात सापडला. ज्या पद्धतीने मुंबईच्या ख्रिस लिनचे अर्धशतक हुकले त्याचप्रमाणे डीविलियर्सचेही अर्धशतक पूर्ण होऊ शकले नाही. गोलंदाजीत चमक दाखवलेल्या हर्षल पटेलने मोलाच्या 4 धावा करत बेंगळुरूला एक रोमहर्षक विजय मिळवून दिला.
आयपीएल स्पर्धेत गेल्या काही मोसमांपासून पहिल्याच सामन्यात पराभूत होण्याची परंपरा मुंबई संघाने यंदाही पाळली. तर दुसरीकडे कोहलीने या सामन्यात नाणेफेक जिंकत आपले यापूर्वीचे अपयश धुऊन काढले. आजच्या सामन्यात पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे कोहली सलामीला फलंदाजीला आला. इतकेच नव्हे तर त्याने तळात फलंदाजी करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरलाही सलामीलाच फलंदाजीला आणले. या जोडीने 36 धावांची सलामी दिली.
तत्पूर्वी, हिटमॅन रोहित शर्मा चुकीच्या कॉलवर धावबाद झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि ख्रिस लिन यांनी केलेल्या फलंदाजीमुळे एक क्षण डाव सावरलेल्या मुंबईच्या नंतरच्या फलंदाजांनी हाराकिरी केली. रॉयल चॅलेंजर बेंगळुरूच्या हर्षल पटेलने केलेल्या भेदक गोलंदाजीसमोर मुंबईचा डाव केवळ 9 बाद 159 धावांवर रोखला गेला.
विराट कोहलीने नाणेफेक जिंकत मुंबईला प्रथम फलंदाजी दिली. त्याचा हा निर्णय चुकीचा ठरणार की काय, अशी सुरुवात रोहित शर्माने लिनच्या साथीत केली. मात्र, त्याला चोरटी धाव घेताना लिनने चुकीचा कॉल दिला व रोहित धावबाद होऊन परतला. त्यानंतर आलेल्या यादवने लिनच्या साथीत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न करताना आक्रमक फलंदाजी केली. मात्र, तो देखील अनावश्यक फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. ही जोडी फुटल्यानंतर मुंबईकडून मोठी भागीदारीच झाली नाही. त्याचवेळी प्रमुख फलंदाजांना पटेलने तंबूचा रस्ता दाखवला व मुंबईच्या संघावर वर्चस्व राखले.
यादव 31 धावांवर परतला तर, त्यानंतर लिनही 49 धावांवर बाद झाला व त्याचे अर्धशतक हुकले. इशान किशन व हार्दिक पंड्याने थोडीफार चमक दाखवली पण त्यांच्या खेळीला पटेलने ग्रहण लावले. त्याने अचूक गोलंदाजी करत डेथ ओव्हर्समध्ये तर कमालच केली.
अखेरच्या षटकात त्याने मुंबईच्या तीन फलंदाजांना बाद करत त्यांचे कंबरडेच मोडले. एकवेळ तो हॅट्ट्रिकवरही होता. मात्र, ती पूर्ण होऊ शकली नसली तरीही त्याने चौथ्या चेंडूवर माक्रो जेसनला बाद करत मुंबईच्या डावाला घरघर लावली.
राहुल चहरही चोरटी धाव घेताना बाद झाला व मुंबईचा डाव 9 बाद 159 धावांवर रोखला गेला. या सामन्यात बेंगळुरूच्या गोलंदाजांनी स्लोअरवन चेंडू टाकत मुंबईच्या तगड्या फलंदाजांना संभ्रमात टाकले. हार्दिक पंड्या, कॅरन पोलार्ड व कृणाल पंड्या यांना तर ही गोलंदाजी कशी खेळायची हेच समजत नव्हते. त्याच गोलंदाजीवर आक्रमक फलंदाजी करताना त्यांनी आपल्या विकेट अत्यंत स्वस्तात गमावल्या.
संक्षिप्त धावफलक –
मुंबई – 20 षटकांत 9 बाद 159 धावा. (ख्रिस लिन 49, सूर्यकुमार यादव 31, इशान किशन 28, रोहित शर्मा 19, हार्दिक पंड्या 13, हर्षल पटेल 5-27, वॉशिंग्टन सुंदर 1-7, काएल जेमिसन 1-27).
रॉयल चॅलेंजर बेंगळुरू – 20 षटकांत 8 बाद 160 धावा. (एबी डीविलियर्स 48, ग्लेन मॅक्सवेल 39, विराट कोहली 33, वॉशिंग्टन सुंदर 10, हर्षल पटेल नाबाद 4, महंमद सिराज नाबाद 0, जसप्रीत बुमराह 2-26, माक्रो जेन्सन 2-28, कृणाल पंड्या 1-25, ट्रेन्ट बोल्ट 1-36).
सामने खेळायला मिळतात हे नशीब – रोहित
करोनाचा धोका असतानाही बायोबबलमुळे सध्या क्रिकेटचे सामने खेळायला मिळत आहेत हेच आमचे नशीब आहे, अशा शब्दांत हिटमॅन रोहित शर्माने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. गेल्या वर्षीपासून देशातच नव्हे तर जगभरात करोनाचा धोका सुरू झाला व सुरुवातीला काही सामने व स्पर्धाही लांबणीवर टाकाव्या लागल्या. त्यानंतर अमिरातीत आयपीएल स्पर्धा सुरू झाली. त्यानंतर ऑस्ट्रेलिया व नंतर इंग्लंडविरुद्धची मालिकाही यशस्वीपणे पार पडली. खेळाडूंना सुरुवातीला बायोबबलमध्येच राहावे लागत असल्याने काही तणाव जाणवत होता; पण याही परिस्थितीत सामने खेळायला मिळत आहेत हेच आमचे नशीब, असेही रोहित म्हणाला.