नवी दिल्ली – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे आणि तृणमूल कॉंग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या कुटुंबीयांना बेकायदेशीर कोळसा खाणींच्या व्यवहारातून आर्थिक लाभ झाला असल्याचा आरोप सक्तवसुली संचलनालयाने केला आहे. अतिशय सुनियोजित पद्धतीने जोपासलेल्या राजकीय आश्रयाच्या जोरावर या बेकायदेशीर खाणींचा उद्योग सुरू असल्याचे ‘ईडी’ने म्हटले आहे.
पश्चिम बंगालचे पोलीस अधिकारी आणि बांकुरा पोलीस स्थानकाचे प्रभारी निरीक्षक अशोक कुमार मिश्रा यांच्या कोठडीसाठी विशेष न्यायालयापुढे सादर केलेल्या रिमांड नोटमध्ये “ईडी’ने हा दावा केला आहे.
अशोक कुमार मिश्रा यांच्यासह तृणमूलचे युवा नेते विनय मिश्रा यांचे बंधू विकास मिश्रा यांना “ईडी’ने अटक केली आहे. या प्रकरणी स्थानिक व्यापारी अनूप मांझी हे मुख्य संशयित आहेत. या पोलीस निरीक्षकास “ईडी’ने 3 एप्रिल रोजी अटक केली होती आणि कोर्टाने त्याला बुधवारपर्यंत कोठडी सुनावली होती.
नोव्हेंबर, 2020 मध्ये पश्चिम बंगालमधील कुनुस्टोरिया आणि काजोरा भागातील ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड खाणींशी संबंधित कोट्यावधी कोळशाच्या घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या सीबीआयचा “एफआयआर’च्या आधारे “ईडी’ने मनी लॉन्डरिंग विरोधी कायद्यांतर्गत हे प्रकरण दाखल केले आहे. अभिषेक बॅनर्जी यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.
मांझी आणि निरज सिंह यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांवरून असे दिसून आले आहे की मांझी कोळसा खाण उत्खननातून झालेल्या गुन्ह्यातून विविध संस्थांना देणग्या दिल्याच्या नोंदी आहेत, असे ईडीने म्हटले आहे.