जालना – जालना जिल्ह्यात उद्या सोमवारपासून सकाळी 6 वाजल्यापासून 17 सप्टेंबरपर्यत जमावबंदी आदेश देण्यात आला आहे. यासंबंधीचे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांनी दिले आहेत. जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर या ठिकाणची परिस्थिती बिघडली असून खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने हे आदेश लागू केले आहेत.
जमावबंदीच्या आदेशामुळे जालन्यात मराठा आरक्षणाच्या निमित्ताने विविध संघटनाकडून आत्मदहन, उपोषण, धरणे, मोर्चे, रास्ता रोको आणि राजकीयदृष्ट्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये होत असलेले आरोप प्रत्यारोप लक्षात घेता कलम (37)1 अन्वये सार्वजनिक ठिकाणी शस्त्रे, लाठ्या, बंदूक, तलवारी, भाले, चाकू आणि शरीरास इजा अथवा अपाय करणाऱ्या वस्तू बाळगता येणार नाहीत.
भाषणातून व्यक्तीच्या किंवा समूहाच्या भावना दुखावता येणार नाहीत, गाणे किंवा वाद्याच्या माध्यमातून कोणाच्या भावना दुखवता येणार नाहीत. आवेशपूर्ण भाषण, अंगविक्षेप अराजक माजेल अशी चित्रे ,निशाणे, घोषणापत्रे वस्तू बाळगता येणार नाहीत.
जालन्यात लागू केलेल्या जमावबंदीच्या आदेशामुळे 6 तारखेची श्रीकृष्ण जयंती, 7 तारखेचा गोपाळकाला आणि 14 तारखेच्या पोळा तसेच 17 सप्टेंबरच्या दिवशी मुक्तीसंग्राम दिनानिमित्त निघणाऱ्या मिरवणुका आणि इतर कार्यक्रम रद्द करावे लागणार आहेत.