पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणा-या पवना आणि आंद्रा धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस घटत चालला आहे. शहरातील सर्व उद्यानातील हिरवळ, झाडे, बाड, बगीचा वाढवण्यासाठी उन्हाळ्यात देण्यात येणारा पाणी पुरवठा बंद केला आहे. यापुढे उद्यानासाठी कासारवाडीतील एसटीपीमध्ये प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरण्यात यावे, असे पाणी पुरवठा विभागाने उद्यान विभागाला कळविले आहे.
शहरात पिंपरी-चिंचवड महापालिकेने लहान मोठ्या क्षेत्रफळाची १४३ उद्याने विकसित केली. सकाळी नागरिक वॉकींग, जॉगिंग, व्यायाम करण्यासाठी उद्यानात जातात. त्याचबरोबर सायंकाळी लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा घेण्यासाठी उद्यानांमध्ये फेरफटका मारत असतात. त्यामुळे काही उद्याने वगळता बहुतांश उद्यानांच्या वेळा पहाटे पाच ते दहा आणि सायंकाळी चार ते रात्री आठ अशाच आहेत.
यावेळेत नागरिकांना उद्यानात फिरायला प्रवेश दिला जातो. परंतु, उद्यानातील हिरवळ, उंच झाडे, फुलांच्या वेली टिकवण्यासाठी उद्यान विभागाला कसरत करावी लागत आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाणी पुरवठा विभागाने उद्यानांचा पाइपलाइनद्वारे केला जाणारा पाणी पुरवठा बंद केला आहे.
आता उद्यानातील झाडे, फुलांच्या वेली, बाड, बगीचा यांची हिरवळ टिकवून ठेवण्यासाठी उद्यान विभागाला कासारवाडीतील एसटीपी प्रकल्पातील प्रक्रियायुक्त सांडपाणी वापरावे लागणार आहे. त्यामुळे पिण्याच्या पाणी केवळ पिण्यासाठीच वापरण्यात येणार आहे. तिव्र स्वरुपाचा उन्हाळा जाणवत असताना संभाव्य टंचाईवर मात करण्यासाठी पाणी पुरवठा विभागाने हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामनाथ टकले यांनी सांगितले.