पुणे – देशभरात सुरू असलेल्या चिनी वस्तूंवरील बहिष्काराच्या मागणीप्रमाणेच चिनी तंत्रज्ञानावरही बहिष्कार करणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने खासगी दूरसंचार कंपन्यांवरही चिनी तंत्रज्ञान वापरण्याबाबत बंदी आणावी, अशी मागणी बीएसएनएल एम्प्लॉईज्ड युनियनने केली आहे.
लडाख येथे भारत आणि चिनी सैन्यांदरम्यान झालेल्या चकमकीनंतर चीनबाबत देशभरात संतापाची लाट आहे. तसेच, धडा शिकविण्यासाठी चिनी वस्तूंवर बहिष्कारही घालण्याची मागणी होत आहे. तर, देशभर ठिकठिकाणी आंदोलनेही होत आहेत. या पार्श्वभूमीवर बीएसएनएलला चिनी तंत्रज्ञानाच वापर टाळण्यासंबंधिच्या सूचना केंद्र सरकारने केल्या आहेत. बीएसएनएलतर्फे केंद्र सरकारच्या भूमिकेचे समर्थन करण्यात येत आहे. मात्र, त्याचबरोबर अन्य खासगी दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांना सुद्धा चिनी तंत्रज्ञान वापरण्यावर निर्बंध घालावेत, असेही बीएसएनएल एम्प्लॉईज्ड युनिअनने सूचवले आहे.
बीएसएनएल एम्प्लॉईज्ड युनियनचे महाराष्ट्र सर्कल सेक्रेटरी नागेश नलावडे म्हणाले, तंत्रज्ञानात भारताने परिपूर्ण असायला हवे. मुंबई, कलकत्ता येथे बीएसएनएल टेलिकॉम कंपनीच्या फॅक्टरीज् आहेत. पूर्वीपासूनच तंत्रज्ञानावर भर द्यायला पाहिजे होता. परंतु, परदेशी तंत्रज्ञान खरेदीवरच केंद्र सरकारने भर दिला. चीनच्या वस्तूंवर बहिष्कार जरूर घातला पाहिजे. पण बीएसएनएलसोबतच अन्य खासगी दूरसंचार कंपन्यांनासुद्धा हा नियम लागू व्हायला पाहिजे.