इंदोर – मध्य प्रदेशातील जबलपूर शहर सध्या चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे आता इथे खायला तंदुरी रोटी मिळणार नाही. जिल्हा प्रशासनाने भट्टीवर तंदुरी रोटी बनविण्यास बंदी घातली आहे. तंदुरी रोटी बनवल्याने प्रदूषण अधिक पसरते, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
हा आदेश येताच हॉटेल मालकांमध्ये खळबळ उडाली आहे. एवढेच नाही तर तंदुरी रोटी खाणाऱ्या ग्राहकांनाही मोठा धक्का बसला आहे. त्याचबरोबर आदेशाचे पालन न करणाऱ्या हॉटेलमालकांवर लाखो रुपयांचा दंडही होऊ शकतो. अशा परिस्थितीत हॉटेल मालकांना मोठा धक्का बसला आहे.
जबलपूर जिल्ह्यातील अन्न सुरक्षा विभागाने शहरातील 50 हॉटेल मालकांना नोटिसा बजावल्या आहेत. यामध्ये हॉटेल मालकांना लाकूड आणि कोळशाद्वारे तंदूर वापरणे बंद करण्यास सांगितले आहे. त्याऐवजी इलेक्ट्रिक किंवा एलपीजी वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रशासनाचे म्हणणे आहे की, तंदूरमधील कोळसा आणि लाकडाच्या धुरामुळे प्रदूषण होते. तंदूर रोट्यांमध्येही कार्बनचे प्रमाण अधिक असते. ते आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे तंदूरऐवजी आता इलेक्ट्रिक किंवा एलपीजी गॅस शेगडी लावावी.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जे मालक आदेशाचे पालन करणार नाहीत त्यांना 5 लाखांपर्यंत दंड होऊ शकतो. हा आदेश येताच हॉटेल मालकांमध्ये नाराजी पसरली आहे. प्रशासनाचा हा आदेश व्यावहारिक वाटत नसल्याचे हॉटेल मालकांचे म्हणणे आहे. इलेक्ट्रिक आणि एलपीजी स्टोव्हमध्ये तंदूरसारख्या रोट्यांची चव चांगली नसते असे त्यांचे म्हणणे आहे.
इलेक्ट्रिक ओव्हनचा वापर महाग होईल
आदेश जारी केल्यानंतर प्रशासनाने हॉटेल मालकांना तीन दिवसांची मुदत दिली आहे. इलेक्ट्रिक ओव्हन किंवा एलपीजी वापरल्यास तंदुरी रोटी महाग होईल, असे हॉटेल मालकांचे म्हणणे आहे. तंदूर बंद करण्यासाठी प्रशासनाने अन्न विभागाच्या अधिकाऱ्यांसह प्रदूषण नियंत्रण पथके तैनात केली आहेत. सध्या, जबलपूर हा बहुधा मध्य प्रदेशातील पहिला जिल्हा असेल. जिथे तंदूरवर बंदी घालण्यात आली आहे.