नवी दिल्ली -दहशतवादी कारवायांत सामील असल्याबद्दल देशात 42 संघटनांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामध्ये लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-महंमद या पाकिस्तानस्थित संघटनांचाही समावेश आहे.
केंद्रीय गृह राज्यमंत्री जी.किशन रेड्डी यांनी मंगळवारी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात संबंधित माहिती दिली. भारतात दहशतवादी कारवाया घडवण्यासाठी सीमेपलिकडून चिथावणी दिली जाते. जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी 2018 ते 2020 या कालावधीत 635 दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्या कालावधीत दहशतवाद्यांनी घडवलेल्या हिंसाचाराच्या घटनांत 115 नागरिक मृत्युमुखी पडले, अशी आकडेवारीही त्यांनी दिली. मागील दोन वर्षांत भारत-पाकिस्तान सीमेलगत घुसखोरीच्या 61 घटना घडल्या. तशाप्रकारच्या 1 हजार 45 आणि 63 घटना अनुक्रमे बांगलादेश आणि नेपाळ सीमेलगत घडल्याची माहितीही सरकारकडून देण्यात आली.