नवी दिल्ली: ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत जरी मला पदक मिळाले तरी जागतिक कुस्ती स्पर्धेतील उपांत्य फेरीत पंचांच्या वादग्रस्त निर्णयामुळे झालेला माझा पराभव मी कधीही विसरणार नाही असे जागतिक स्पर्धेत ब्रॉंझपदक मिळविणारा मल्ल बजरंग पुनियाने सांगितले.
बजरंगला या स्पर्धेतील 65 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत कझाकिस्तानचा खेळाडू दौलिएती नियाझ्बेकोवविरूद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. ही लढत 9-9 अशा बरोबरीत सुटली होती. पंचांनी नियाझ्बेकोवला विजयी घोषित केले. या निर्णयाबाबत भारताकडून आक्षेपही घेण्यात आला होता. मात्र पंचांनी भारताचे अपील फेटाळले.
बजरंगने सांगितले की, ही लढत माझ्या चुकांमुळे नव्हे तर पंचांच्या पक्षपाती निर्णयामुळे गमावली. त्यामुळे सुवर्णपदकाच्या संधीपासून मी वंचित राहिलो. जगज्जेतेपद मिळविण्याची मला खात्री होती. हे दु:ख पचविणे खूप अवघड आहे. जरी मी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविले तरी जागतिक स्पर्धेतील उपांत्य फेरीत आपली फसवणूक करण्यात आली हे सतत माझ्या मनात राहणार आहे. ऑलिम्पिकसाठी मी भरपूर मेहनत करणार आहे. त्या स्पर्धेत सोनेरी कामगिरी करण्याचे माझे ध्येय आहे.
जागतिक स्पर्धेतील 86 किलो गटात रौप्यपदक मिळविणारा दीपक पुनियाने सांगितले की, या स्पर्धेतील पहिल्या फेरीची कुस्ती खेळतानाच मला दुखापत झाली होती. ही दुखापत नंतर वाढत गेली. अंतिम फेरीत मी खेळलो असतो तर कदाचित कायमस्वरूपी दुखापत झाली असती. वैद्यकीय तज्ञांनी मला 15 ते 20 दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. गेल्या महिन्यात मी कनिष्ठ गटाच्या जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. त्यामुळेच मला वरिष्ठ गटाच्या जागतिक स्पर्धेत खेळताना फायदा झाला. भावी करिअरमध्ये अव्वल यश मिळविण्यासाठी मला तांत्रिक सरावावर भर द्यावा लागणार आहे.