जागावाटपाचा तिढा सुटेना, युतीत अस्वस्थता
मुंबई – “आमचं ठरलंय’ असं सांगणाऱ्या शिवसेना-भाजपातील जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. उलट चर्चा लांबल्याने आता युतीतील अस्वस्थता व तणाव वाढत चालला आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी युतीचे जागावाटप भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी झालेल्या चर्चेपेक्षाही कठीण असल्याचे भाष्य केले आहे. राऊत यांच्या या विधानामुळे युती होणार किंवा नाही, याबाबत आता संभ्रम वाढला आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज युतीच्या चर्चेची तुलना भारत-पाकिस्तानच्या फळणीशी केली. फाळणीच्या वेळी दोन देशात झालेल्या चर्चेपक्षा 288 जागांचे वाटप कठीण आहे. 2014 साली आम्ही सरकारमध्ये न बसता विरोधी बाकावर बसलो असतो तर आजचं चित्र वेगळ दिसलं असतं, असे सूचक विधान करताना, जागा वाटपासंदर्भात जो काही निर्णय होईल ते आम्ही सांगू, असे राऊत म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्यावेळी जगावाटपाचे सूत्र ठरलेले आहे व भाजप आपला शब्द पाळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्रात आता निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी आघाडी आणि मित्रपक्षांच्या जागावाटपाचा फॉर्मुला जाहिर केला आहे. अशा परिस्थितीत विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली व दोन दिवसांनी उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात होणार असली तरी युतीच्या जागावाटपाचा निर्णय अजून झालेला नाही.
लोकसभा निवडणुकीच्यावेळी ठरलेले जगावाटपाचे सूत्र कायम राहिले पाहिजे असा आग्रह धरणाऱ्या शिवसेनेने थोडी-फार तडजोड करण्याची तयारी दर्शवली असली तरी 120 पेक्षा अधिक जागा देण्याची भाजपाची तयारी नाही. याशिवाय शिवसेनेने मुंबई, पुणे व नाशिक मधील भाजपाचे आमदार असलेल्या सात जागांवर दावा सांगितला असल्याने पेच सुटत नसल्याचे समजते. भाजपा अध्यक्ष गुरुवारी मुंबईत येणार अशी चर्चा होती. परंतु त्यांचाही दौरा रद्द झाल्याने तोडगा पेच वाढल्याची चर्चा आहे. निर्णय लांबत चालल्याने युतीत व विशेषतः शिवसेनेत अस्वस्थता आहे.
जागावाटप कठिण प्रश्न नाही – चंद्रकांत पाटील
राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघातील वाटपाचा मुद्दा हा भारत-पाकिस्तान फाळणीपेक्षा भयंकर असल्याचे विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज केले. याबद्दल विचारले असता पाटील यांनी, राऊत वेगवेगळी उदाहरणे देऊन आपला मुद्दा मांडत आहेत. मात्र, माझ्या मते विधानसभेचे जागावाटप हा कठीण प्रश्न नाही, असे ते म्हणाले.