दोन वर्षांपासून शहरवासीयांना प्रतीक्षा : 70 टक्के काम झाल्याचा प्रशासनाचा दावा
पिंपरी – निसर्गकवी बहिणाबाई चौधरी उद्यानाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. या उद्यानाचे काम या वर्षीच्या शेवटपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, संथगतीने काम सुरू असल्यामुळे उद्यानातील प्राणी-पक्ष्यांची हेळसांड सुरू आहे.
संभाजीनगर येथे महापालिकेचे निसर्गकवी बहिणाबाई चौधरी उद्यान आहे. साडेसात एकर जागेवर हे उद्यान आहे. उद्यानाच्या कामासाठी 14 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार गेल्या दोन वर्षांपासून उद्यानाच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. पक्ष्यांना मनमोकळेपणाने वावरता यावे यासाठी उद्यानातील प्रदेश विकसित करण्याचे काम सुरू आहे. पाणथळ पक्ष्यांसाठी डोम आकाराचा प्रदेश विकसित करण्यात आला आहे. कासवांसाठी समोरासमोर मोठे कक्ष विकसित करण्याचे काम सुरू आहे. सर्पांसाठी 22 वैशिष्ट्यपूर्ण गुहा उभारण्याचे काम करण्यात येणार आहे. मात्र, हे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे सर्पांना जुन्या कक्षामध्येच ठेवण्यात आले आहे. सुसर आणि मगरसाठी वेगळे कक्ष उभारण्यात येणार आहेत. उद्यानाचे काम करण्यासाठी तेथील पशु-पक्ष्यांना तात्पुरते जाळ्यांमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यासाठी पत्र्याची शेड उभारून त्याला चारही बाजूने जाळी लावण्यात आली आहे. मात्र, पत्र्यामुळे उन्हाळ्यात प्राण्याच्या शरीराचे तामपान व्यवस्थित ठेवताना अडचणी येतात. त्यामुळे पशु-पक्ष्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
विशेष कक्षांचे कामही अद्याप पूर्ण झालेले नाही. उद्यानातील अंतर्गत रस्ते, कर्मचाऱ्यांसाठी निवासी खोल्या, प्रवेशद्वार यांचेही काम संथगतीने सुरू आहे. उद्यान विकासासाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये 18 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
काही कामांना अद्याप सुरुवातच नाही
उद्यानामध्ये विद्युतविषयक कामे बाकी आहेत. त्याचप्रमाणे शोभेच्या झाडांची लागवड करणे बाकी आहे. नैसर्गिक वातावरणासाठी धबधब्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. त्या कामांना अद्याप सुरुवात करण्यात आली नाही. त्यामुळे उद्यानाचे काम लांबण्याची शक्यता आहे.
उद्यानाचे काम 70 टक्के पूर्ण झाले आहे. थोड्याच दिवसांत काम पूर्ण होईल. त्यानंतर प्राण्यांचा सांभाळ करण्यासाठी सहा कर्मचारी नेमण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे पशुवैद्यकीय अधिकारी, बायोलॉजिस्ट ऑफिसर यांची सहा महिन्यांसाठी मानधनावर नियुक्ती करण्यात येत आहे.
– सुनील वाघुंडे, कार्यकारी अभियंता.
गेल्या दोन वर्षांपासून उद्यान बंद आहे. या उद्यानामध्ये मुक्या पशु-पक्ष्यांना आसरा दिला जातो. रहिवासी भागामध्येही कुठे सर्प आढळल्यास या उद्यानामध्ये ठेवण्याची व्यवस्था केली आहे. मात्र, हे उद्यान बंद असल्याने गैरसोय होत आहे. उद्यानाचे काम तत्परतेने होण्यासाठी महापालिका आयुक्तांना वारंवार पत्र दिले आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन येथील उद्यान त्वरित सुरू करावे.
– राजू कदम, सर्पमित्र.