वॉशिंग्टन :- भारत आणि अमेरिकेदरम्यानचे संबंध सर्वाधिक उंचीवर असून, भविष्यात ते चंद्रापर्यंतच्या उंचीवर जातील. ज्याप्रमाणे चांद्रयान चंद्रावर पोचले आहे, त्याचप्रमाणे हे संबंधदेखील तितक्याच उंचीवर असतील, कदाचित त्याहीपेक्षा अधिक उंचीवर जातील, असा विश्वास परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केला आहे.
भारतीय दूतावासाने आयोजित केलेल्या “सेलिब्रेटिंग कलर्स ऑफ फ्रेन्डशिप’ कार्यक्रमामध्ये भारतीय समुदायाला संबोधित करताना ते बोलत होते. या एकत्रीकरणाला सर्व अमेरिकेतून भारतीय समुदायाचे नागरिक उपस्थित राहिले होते.
भारत आणि अमेरिका एकमेकांसाठी इष्ट, योग्य भागीदार मानत आहेत. एखाद्या व्यक्तीला सहजपणे फोन लावावा, इतके हे संबंध स्वाभाविक आणि नैसर्गिक बनले आहेत. अमेरिकेच्या पाठिंब्याशिवाय “जी-20′ परिषद यशस्वी होऊ शकलीच नसती, असेही जयशंकर म्हणाले.
खरे तर “जी-20′ परिषदेचे यश सदस्य देशांचे यश आहे. पण खरे तर हे यश भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या संबंधांचे आहे. दोन देशांमध्ये व्यापार, राजकारण, सांस्कृतिक संबंधही असतात. मात्र दोन्ही देशांमधील मानवी बंधनांमुळेच भारत-अमेरिकेतील संबंध विशेष ठरले आहेत. पूर्वी दोन्ही देशांचे एकमेकांबरोबर व्यवहार होत होते. आता दोन्ही देश एकमेकांबरोबर मिळून काम करत आहेत, असेही जयशंकर म्हणाले.
भारत आणि अमेरिका मिळून इंडिया-मिडल इस्ट इकॉनॉमिक कॉरिडॉर, आय2यू2, इंडिया- पॅसिफिक को-ऑपरेशन आणि क्रिटिकल इमर्जिग टेक्नोलॉजीमध्ये एकत्र काम करत असल्याचेही जयशंकर यांनी नमूद केले.