कवठे, – करोनाच्या वाढत्या संकटामुळे कवठे येथील बगाड यात्रा रद्द करण्याचा एकमुखी निर्णय कवठेकरांनी घेतला आहे. येथील बगाड यात्रा दि. 1 व 2 मे रोजी होणार होती. वाईचे तहसीलदार रणजित भोसले यांनी कवठे गावातील प्रमुखांच्या दोन वेळा बैठका घेऊन त्यांना बगाड यात्रा न करण्याचे प्रबोधन केले.
कोरेगावचे पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे व अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनीही बैठका घेतल्या. प्रशासनाकडून कडक कारवाईचे संकेत दिले गेले होते. भुईंजचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांनी आज सायंकाळी निवडक ग्रामस्थांची बैठक घेतल्यानंतर ग्रामस्थांनी कोणत्याही परिस्थितीत बगाड काढणार नसल्याचे व प्रशासनास सहकार्य करणार असल्याचे सांगितले. तहसीलदार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्या आवाहनानुसार ही बगाड यात्रा रद्द केली असल्याचे कवठे ग्रामस्थांनी जाहीर केले.