सातारा – करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शहरासह जिल्ह्यात गंभीर परिस्थिती आहे. कोणीही घाबरून न जाता ताप, सर्दी, खोकला आदी कोणतेही लक्षण आढळल्यास त्वरित करोनाची चाचणी करून घ्यावी. दुखणे अंगावर काढल्यास जीवावर बेतण्याचा धोका असून कोणीही करोनाबाबत हलगर्जीपणा करून स्वतःचा, कुटुंबीयांचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रकात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे की, करोनाचा विळखा अधिकच घट्ट होत चालला आहे. प्रशासनाकडून उपाययोजना सुरु असल्या तरी करोनाला अटकाव करण्यासाठी प्रत्येकानेच जबाबदारीने वागले पाहिजे. हा बरा होणारा आजार आहे. त्यामुळे घाबरून जाऊन अथवा मला काय होतंय, असं समजून दुखणे अंगावर काढण्याचे गंभीर परिणाम भोगावे लागत आहेत.
अगदी जीवावर बेतल्यानंतर रुग्ण उपचारासाठी दाखल होतात आणि मग वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे या आजारासंबंधी कोणतेही लक्षण दिसल्यास तातडीने चाचणी करणे आणि त्यावर उपचार सुरु करणे आवश्यक आहे. मगच पुढील धोका टळणार आहे. लक्षणे असतानाही अनेकजण घरीच बसून दुखणे अंगावर काढतात. यामुळे ते कुटुंबीयांच्या जीवाशी खेळत असतात. ही बाब अतिशय गंभीर आहे. त्यामुळे चाचणी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.