आवर्तनामुळे शेतकरी समाधानी ः यंदाचा उन्हाळा सुसह्य ठरणार
केडगाव -येथील परिसरात असणाऱ्या शेतकऱ्यांना बेबी कालव्याच्या पाण्याचा लाभ होताना दिसत असून 23 फाट्याला सध्या उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आहे.
यंदा धरणक्षेत्रात समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध आहे. मागीलवर्षी पाऊस उशिरा; परंतु समाधानकारक झाला. त्यामुळे चालू वर्षी उन्हाळा जास्त शेतकऱ्यांना जाणवणार नाही, असे चित्र दिसून येत आहे.
सध्या विहिरी आणि कुपनलिकांना पाणीपातळी चांगली आहे. शिवाय आता बेबी कालव्यातून उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आहे. याचा लाभ शेतकरी बांधव घेताना दिसत आहेत. चालूवर्षी मात्र शेतीच्या पाण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ येईल, असे वाटत नाही. कारण बेबी कालवा आणि मुळा मुठा उजवा कालवा यामधून शेतीसाठी आवर्तन सोडण्यात येईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. धरणक्षेत्रात पाणीसाठा मुबलक असला तरी खरी गरज आहे पाटबंधारे खात्याच्या नियोजनाची.
प्रभातचा पाठपुरावा
दोन वर्षांपूर्वी चित्र मात्र याच्या उलट होते. बेबी कालव्यातून सोडण्यात येणाऱ्या आवर्तनाचा लाभ केवळ 22 फाट्यावर असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळत असे 23 फाट्यावर असणारा शेतकरी या पाण्याच्या आवर्तनापासून वंचित राही. याबाबत दैनिक प्रभात वृत्तपत्राने नेहमीच 23 फाट्यावर असणाऱ्या शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला होता. यवत पाटबंधारे खात्याचे अधिकारी बनकर यांनीही या वृत्ताची दखल घेतली होती आणि आवर्तन सोडले होते.