पुणे – जिल्ह्यात “जलजीवन मिशन’अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणी देण्याचे नियोजन आहे. राज्यात जलजीवनच्या प्रशासकीय मान्यतेत आणि सविस्तर प्रकल्प अहवालामध्ये पुणे जिल्हा परिषद चौथ्या क्रमांकावर आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. त्याचप्रमाणे अमृतमहोत्सव कालावधी दरम्यान “हर घर नल से जल’ ही विशेष मोहीम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
“जलजीवन मिशन’अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणी देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा काम करत आहे. त्यामध्ये जिल्हा समाधानकारक काम करत असल्याचे प्रसाद यांनी सांगितले. तसेच तांत्रिक मंजुरीमध्ये पाचवा, निविदा मागविण्यामध्ये सहावा, कार्यारंभ आदेशामध्ये (वर्क ऑर्डर) आठवा, तर कामे प्रगतीपर असलेल्यांमध्ये राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या अमृत महोत्वानिमित्त सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबांना “जलजीवन मिशन’अंतर्गत पाणीपुरवठा प्रतिदिन प्रतिव्यक्ती 55 लिटरप्रमाणे केला जाणार आहे.
यासाठी प्रत्येक कुटुंबाला नळ जोडणीद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. यासाठी विशेष ग्रामसभा घेतल्या जाणार आहेत. गावातील सर्व कुटुंब, शाळा, अंगणवाडी या ठिकाणी स्वतंत्र नळ जोडणी करून तिथे पाणीपुरवठा उपलब्ध करून देत असल्यास तसा ग्रामपंचायतचा ठराव करणे, तसेच कुटुंबांना नळ जोडणीद्वारे पाणीपुरवठा होत असल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या मोहिमेची गाव तालुका जिल्हास्तरावर प्रसिद्धी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गाव स्तरावर विद्यार्थ्यांची रॅली काढणे, बॅनर पोस्टर भिंती रंगकाम करण्यास सांगितले आहे.