मुंबई – एका आयुष्यात माणूस कित्येक आयुष्याचे काम करून ठेवू शकतो याचे आदर्श उदाहरण, ज्यांना गांधीजींनी अभयसाधक म्हटले ते म्हणजे कर्मयोगी बाबा आमटे. मुरलीधर देविदास आमटे म्हणजेच बाबा आमटे यांचा जन्म 26 डिसेंबर1914 मध्ये हिंगणघाट येथे झाला. शिक्षण, आरोग्य, शेती, पर्यावरण, जलसंधारण, उद्योग, रोजगारनिर्मिती अशा नानाविध क्षेत्रांमध्ये प्रयोग करीत त्यामध्ये बाबांनी यश मिळविले.
जाणून घेऊ बाबा आमटे यांच्या आयुष्याबद्दल काही खास गोष्टी
1949-50 या कालावधीत त्यांनी पंडीत जवाहरलाल नेहरूंच्या शिफारसीमुळे फक्त डॉक्टरांना करता येणारा कुष्ठरोग निदान आणि चिकित्सेवरील अभ्यासक्रम पूर्ण केला.
बाबा आमटे यांना डॉक्टर होण्याची इच्छा होती पण त्यांनी वडिलांच्या इच्छेखातर वकिलीचे शिक्षण घेतले.
1952 साली वरोड्याजवळ बाबा आमटे यांनी आनंदवनाची स्थापना केली. 2008 सालापर्यंत 176 हेक्टर क्षेत्रात पसरलेले आनंदवन 3500 कुष्ठरोग्यांसाठी घर बनले आहे.
बाबा आमटे यांनी सुरू केलेला हा वसा आता त्यांच्या कुटुंबीयांनी पुढे कायम ठेवला आहे.
समाजकार्यामध्ये आपलं जीवन अर्पण केलेल्या बाबा आमटे यांनी ‘ज्वाला आणि फुले’ आणि ‘उज्ज्वल उद्यासाठी’ हे काव्यसंग्रह लिहिले आहेत.
महात्मा गांधी यांच्या संपर्कात आल्यानंतर बाबा आमटेंनी गांधींजींच्या सत्य, नीति व निर्भयतेवर आधारलेल्या विचारसरणीने प्रभावित होऊन दीनदलितांच्या सेवेसाठी काम केले.
नर्मदा बचाव आंदोलनातही बाबांचा सक्रीय सहभाग होता.
धडाडी, जिद्द तरीही संवेदनशील व्यक्तिमत्त्वाच्या बाबा आमटे यांनी आपलं जीवन कुष्ठरोग्यांसाठी अर्पण केले. 2008 साली रक्ताच्या कर्करोगाच्या विळख्यात अडकलेल्या बाबा आमटे यांचं निधन झालं.
2018 म्हणजे मागील वर्षी बाबा आमटे यांच्या कार्यकर्तृत्त्वाला सलाम म्हणून गूगल डुडलच्या माध्यमातून खास श्रद्धांजली अर्पण करण्यात आली होती.