Ayushmann Khurrana| बॉलीवूड अभिनेता आयुष्यमान खुराना याने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्याने सिनेसृष्टीत मोठे यश मिळवले आहे. नुकतेच त्याने मराठी सिनेमामध्ये काम करण्याबाबत भाष्य केले आहे.
‘सैराट’सारखी वेगळी कथा असल्यास मला मराठी सिनेमात काम करायला नक्कीच आवडेल, असे स्पष्ट मत अभिनेता आयुष्यमान खुराना याने व्यक्त केले आहे. दरम्यान, नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या मराठी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती. आजही या चित्रपटाची सर्वत्र क्रेझ पाहायला मिळते.
मुंबई मराठी पत्रकार संघाच्यावतीने अभिनेता आयुष्यमान खुराना याचा पत्रकार संघात वार्तालाप पार पडला. यावेळी त्याने पत्रकारांशी संवाद साधला. त्याच्या सिनेमाबाबत आयुष्मान खुराना म्हणाला की, “कोणत्याही सिनेमात काम करताना तो सिनेमा हिट होईल, या उद्देशाने मी कधीच काम करीत नाही. प्रेक्षकांसाठी वेगळी, नवीन कथा आणि नवीन काहीतरी करण्याच्या विचारानेच मी काम करतो.” Ayushmann Khurrana|
यावेळी त्याने चंदीगड ही माझी जन्मभूमी असली तरी मुंबई ही माझी कर्मभूमी आहे. सगळेजण स्वप्न घेऊन मुंबईत येतात तसाच मी मुंबईत आलो आणि आता मी मुंबईकर आहे, असेही सांगितले.
त्याने राष्ट्रीय पुरस्कार मिळण्याबाबत देखील भाष्य केले आहे. “राष्ट्रीय पुरस्कार मिळाला ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. पुरस्कार मिळावा या उद्देशाने मी सिनेमात कधीच काम करीत नाही आणि केलेही नाही. प्रेक्षकांना आवडेल अशाच नवनवीन भूमिका साकारण्याचा प्रयत्न मी करत असतो,” असेही आयुष्यमानने म्हटले आहे. Ayushmann Khurrana|
हेही वाचा: