पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिकेच्या शाळेत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहचविण्याऐवजी भंगाराचे गोडाऊन करण्याकडे महापालिकेचा कल दिसत आहे. संत तुकाराम नगर येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय माध्यमिक शाळेच्या आवारात नको असलेल्या साहित्यांचा ढीग रचून ठेवला आहे. या परिसरातच रद्दी देखील मोठ्या प्रमाणात पडली आहे. सध्या पावसाचे दिवस पाहता डासोपत्ती होऊन विद्यार्थ्यांना साथीच्या आजाराचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून खराब झालेल्या वस्तूंची माहिती सर्व शाळांना मागवली. यामध्ये बेंच, खुर्ची, कपाट आदीसह इतर वस्तूंचा समावेश होता. सर्व माध्यमिक शाळांनी त्या बाबतची माहिती दिली. त्यानुसार खराब झालेले सर्व साहित्य एकत्रित ठेवून त्याचा लिलाव पद्धतीने विक्री करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. मात्र शहरातील महापालिकेच्या इतर अनेक मोकळ्या जागा असताना संत तुकाराम नगर येथील पंडित दिनदयाळ उपाध्याय शाळेचीच जागा निवडण्याचा अजब प्रकार समोर आला आहे.
शहरातील 18 माध्यमिक शाळांचे खराब झालेले बेंच, खुर्ची, कपाट आदींचा ढीग शाळेच्या आवारात रचून ठेवण्यात आला आहे. त्याच्या शेजारीच वही, पुस्तकांच्या रद्दीचा ढीग पडला आहे. गेल्या आठवड्याभरापासून हे साहित्य पडले असल्याचे सांगण्यात येत आहे. 24 जुलै रोजी लिलाव पद्धतीने विक्री होणार आहे. मात्र तो पर्यंत त्याचा त्रास शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सहन करावा लागणार आहे. विद्यार्थ्यांना त्याचा काही त्रास झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न या निमित्त उपस्थित होत आहे.
स्वच्छतेच्या आवाहनाला केराची टोपली
सध्या पावसाचे दिवस आहेत. डेंग्यू, मलेरिया आदीसारखे साथीचे आजार पसरत आहेत. या बरोबरच शहरात सर्दी, तापाचे रुग्णही मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. त्यामुळे परिसराची स्वच्छता ठेवण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र महापालिकेच्या या आवाहनाला शिक्षण विभागाकडूनच केराची टोपली दाखवली जात असल्याचे या निमित्त समोर आले आहे.