नवी दिल्ली – भारत हा देश हिंदूबहुल आहे, हे या देशातील माॅल व हॉटेलचालक विसरत आहेत का? तुम्ही जर ख्रिसमसला सान्ताक्लाॅजची आणि ख्रिसमस ट्रीची सजावट करत असाल, तर आता तुम्ही अयोध्येतील श्रीराम मंदिराची सजावट करायला हवी. तुम्ही या विनंतीकडे दुर्लक्ष कराल, तर तुम्हाला कसे उत्तर द्यावे हे इंदूरच्या लोकांनाही माहित आहे, अशा शब्दांत इंदूरचे महापौर पुष्यमित्र भार्गव यांनी शहरातील माॅल व हॉटेलचालक यांना ‘प्रेमळ धमकी’ दिली आहे.
२२ जानेवारीला अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीमुळे इंदूरमध्येही अनेक स्तरांवर कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. या संदर्भात भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि इतर संघटनांचे नेते लोकांना आवाहन करत आहेत की त्यांनी सर्वत्र प्रभू रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात साजरा करावा.
याच शृंखलेत महापौर पुष्यमित्र भार्गव यांनी शहरातील मॉल आणि हॉटेलचालकांना त्यांच्या मॉल्स आणि हॉटेलमध्ये रामाची मूर्ती बसवण्याची विनंती केली होती. यावर काही ऑपरेटर्सनी आक्षेप घेतला, त्यानंतर आज महापौरांनी सर्वांना कडक शब्दात ताकीद दिली.
काय म्हणाले महापौर?
पुष्यमित्र भार्गव म्हणाले की, आम्ही शहरातील सर्व मॉल, रेस्टॉरंट आणि संस्थांना राम मंदिराच्या प्रतिकृती बसविण्याची विनंती केली होती. हा विषय बर्याच लोकांच्या मनात होता, म्हणून मी त्यांना सांगू इच्छितो की जर २५ डिसेंबर ते २ जानेवारी आणि आतापर्यंत अनेक ठिकाणी सांताक्लॉज आणि ख्रिसमस ट्री लावले गेले असतील आणि ते लावण्यास तुमची कोणतीही हरकत नसेल तर राममंदिराची प्रतिकृती बसवण्यासही हरकत नसावी. या राममय उत्सवात कोणी असहकार्य दाखवले तर त्यांना कसे प्रत्युत्तर द्यावे हे इंदूरच्या जनतेला माहीत आहे. यावर कोणाचाही आक्षेप असेल असे मला वाटत नाही.