अयोध्येत आज प्रत्यक्ष रामजन्मभूमीवर राममंदिर उभारणीच्या कामाला प्रारंभ होतो आहे. अनेकांसाठी हा आनंदाचाच सोहळा आहे. रामजन्मोत्सवाच्या आनंदासारखा हा मंगलमयी सोहळा आपल्याला “याची देही याची डोळा’ अनुभवायला मिळत असल्याच्या कृतार्थ भावना अनेकांनी व्यक्त केल्या आहेत. शेकडो वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्यानगरीत आज बुधवारी प्रत्यक्ष मंदिर उभारणी सुरू होईल.
या दिवसासाठी डोंगराएवढ्या असंख्य अडचणींचा सामना करावा लागला आहे. या प्रकरणाची सारी पार्श्वभूमी लोकांना चांगली माहिती आहे. त्याची नव्याने उजळणी करून त्या कटू आठवणींना उजाळा देण्याची गरज नाही. हा प्रसंग, “हास्यात आजच्या या कळ कालची कशाला’, या काव्यपंक्तीची आठवण करून देणारा आहे. मंदिराच्या लढ्यासाठी झालेली कोर्टकचेरी, हिंसाचार, दंगली, कारसेवा, रथयात्रा या साऱ्या प्रकरणांच्या आठवणी या भव्य मंदिर निर्मितीने कायमस्वरूपी पुसल्या जाव्यात, अशी अपेक्षा आहे. रामायणातल्या कथा लोकांना जितक्या परिचित, तितक्याच या मंदिर उभारणीच्या संघर्षाच्या कथा लोकांच्या स्मृतीत वसल्या आहेत. त्यातून समाजमनावर उठलेले ओरखडे आता कायमस्वरूपी बुजवण्याचा हा दिवस आहे. अयोध्येत रामाचे मंदिर होऊच नये, अशी भूमिका असणारे लोक फारच थोडे होते. किंबहुना त्यांचा या संबंधातील विरोध वेगवेगळ्या भूमिकेतून असला तरी प्रत्यक्ष अयोध्यानगरीतील रामाच्या मंदिराला तसा कोणाचा फारसा विरोधच नव्हता.
या प्रकरणात एक वादी असणारे इक्बाल अन्सारी हेही उद्या मंदिर भूमिपूजनाला जाणार आहेत, त्यावरून हा सारा रोख लक्षात यावा. पण या विषयात जेव्हा राजकारण शिरले तेव्हापासून हा मामला अधिक बिघडला. अयोध्येतील राममंदिर हा एखाद्या राजकीय पक्षाचा व्यक्तिगत मामला असता कामा नये आणि तो निवडणुकीत मते मिळवण्यासाठीचा तर मुळीच विषय बनता कामा नये अशी धारणा असणारे असंख्य लोक आजही या देशात आहेत. त्या भूमिकेतून त्यांनी अयोध्या या विषयाला सतत विरोधी भूमिका घेतली असली तरी त्यांची प्रत्यक्ष राम जन्मभूमीस्थळी राममंदिर उभारण्यास विरोध नव्हता. हा धार्मिक विषय धार्मिक पातळीवरच ठेवावा त्याचा राजकीय उपयोग होऊ नये, अशी त्यांची धारणा होती.
कॉंग्रेस राममंदिराच्या विरोधात आहे, अन्य सेक्युलर पक्ष राममंदिराच्या विरोधात आहेत, बाकी डाव्यांचा तर या विषयाशी संबंधच नाही, राममंदिर आंदोलनाला विरोध करणारे सारेच कसे देशविरोधी आहेत, वगैरे सारे युक्तिवाद मधल्या काळात आपण सर्वांनी ऐकले आहेत. तद्वतच या विरोधातील युक्तिवादही ऐकले आहेत. वास्तविक कॉंग्रेस सरकारच्या काळात नोव्हेंबर 1989 मध्येच राजीव गांधी यांच्या सरकारने अयोध्येत मंदिराच्या शिलान्यासाला अनुमती दिली होती, त्यामुळे त्याचवेळी मंदिराच्या उभारणीचे भूमिपूजन झाले असताना आता पुन्हा भूमिपूजन कसले, असाही आक्षेप घेतला गेला. पंतप्रधान मोदींच्या व्यक्तिगत राजकारणासाठी या साऱ्या विषयाचा उपयोग करून घेतला जात आहे, त्यांचा या मंदिर आंदोलनाशी संबंधच काय, असे मुद्देही चर्चेत आणले गेले आहेत.
या मंगल सोहळ्याला केवळ मोदी विरोधक राजकारण्यांकडूनच आक्षेप घेतला गेला आहे, असे नव्हे तर काही धर्माचार्यही या अनुषंगाने वेगळी मते व्यक्त करताना दिसले आहेत. मग मुहुर्ताचाही विषय या चर्चेत आणला गेला. स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी, ज्या दिवशी हा भूमिपूजन सोहळा होणार आहे त्या दिवशी कोणताही मुहूर्तच नसल्याने हा घाट कशासाठी घातला जात आहे असा एक नवीन मुद्दा उपस्थित केला आहे. मुहूर्त नसताना हे भूमिपूजन घेणे अधार्मिक व अशास्त्रीय आहे, असेही मत त्यांनी नोंदवले आहे. त्यावरून हा सोहळाच पुढे ढकलण्याची मागणी काहींनी पुढे केली. हा सारा प्रकार पाहिल्यानंतर या मंदिरात रामलल्ला सुखासुखी विराजमान होण्यातील अडथळे अजून पूर्ण संपलेले नसल्याचे दिसून आले. मंदिर उभारणीतील बाकीचे सर्व मोठे अडथळे पार पडल्यानंतर आता या असल्या बारीकसारीक अडचणींमुळे हे काम थांबण्याची शक्यता नाही.
ऐन करोनाच्या संकट काळात अयोध्येत होणाऱ्या या सोहळ्याला करोनाचेही काही प्रमाणात गालबोट लागले आहे. मंदिराच्या मुख्य पुजाऱ्याला आणि त्या ठिकाणी बंदोबस्ताला असलेल्या काही पोलिसांनाही करोना झाला. त्याचीही चर्चा रंगली. मग त्यात कोणाला स्वरूपानंद सरस्वती यांनी व्यक्त केलेली शंका खरी ठरू लागल्याचाही भास झाला. या साऱ्या गमतीजमतीतून वाट काढत आज मंत्रोच्चारात राममंदिराचा विधिवत पायाभरणी समारंभ होईल. येत्या काही दिवसांत त्या पवित्र जागेवर भव्य मंदिर आकाराला येईल आणि अनेक वर्षांची लोकांची इच्छा फलद्रुप होईल, याचे निश्चितच समाधान आहे. प्रभू रामचंद्रांची प्रतिमा लोककल्याणकारी राजा अशी आहे.
“रामराज्य’ ही उदात्त संकल्पना त्यांच्या काळीच रूजली. त्या अर्थाने देशात आता “रामराज्य’ अवतरावे अशी अपेक्षा आहे. एका धर्माने दुसऱ्या कोणत्या तरी धर्मावर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून या मंदिराकडे पाहिले जाऊ नये, अशी सर्वांचीच इच्छा आहे. दुर्दैवाने मधल्या काही काळात देशात धार्मिक उन्माद वाढवण्यासाठी या विषयाचा वापर केला गेला, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. पण त्याची मोठी किंमत आपल्या सर्वांनाच सामाजिक अशांततेच्या रूपाने मोजावी लागली आहे. मुळात अशा विषयांचा आपले राजकीय बस्तान बसवण्यासाठी कोणी उपयोग करून घेता कामा नये, अशीही सूचना यानिमित्ताने कटाक्षाने करण्याची व ती अमलात आणण्याची गरज आहे. “झाले गेले गंगेला मिळाले’, आता देशात नवयुग अवतरावे.
संपूर्ण देशासाठी आजचा हा सोहळा अत्यंत विलोभनीय आणि मनःशांती देणारा तसेच समाधानाची भावना निर्माण करणारा सोहळा ठरला पाहिजे. त्यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना संबंधितांनी केली आहेच. त्यांनी हाती घेतलेले हे कार्य निर्विघ्नपणे पार पडो आणि अयोध्येच्या प्रांगणात रामलल्ला दिमाखात विराजमान होवोत, हे मंदिर धार्मिक उन्मादापेक्षा उदात्त आणि महनमंगल वातावरण निर्मितीसाठीचे प्रेरणास्थान ठरो, हीच प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना!