मुंबई : केंद्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्रालयाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा कौशल्य विकास आराखडा स्पर्धेत राज्यातील पाच जिल्ह्यांना 202-21 चे उत्कृष्ट जिल्हा कौशल्य विकास आराखडा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. राष्ट्रीय पातळीवर सादरीकरणाकरीता निवड झालेल्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक जिल्हे महाराष्ट्र राज्याचे असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
सातारा आणि सिंधुदुर्ग (Award for Excellence), वाशिम आणि ठाणे (Certificate of Excellence) तर सोलापूर (Letter of Appreciation) या जिल्ह्यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. केंद्रीय कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्री डॉ. धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत गुरुवारी (9 जून 2022) नवी दिल्ली येथे पुरस्कार वितरण होणार आहे.
केंद्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्रालयाद्वारे आयोजित जिल्हा कौशल्य विकास आराखडा स्पर्धेत राज्यातील ५ जिल्ह्यांना २०२०-२१ चे उत्कृष्ट जिल्हा कौशल्य विकास आराखडा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री @rajeshtope11 यांनी दिली. pic.twitter.com/tKeEOgWHm5
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 8, 2022
कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, कौशल्य विकास आयुक्त तथा कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाह यांनी सबंधित जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी तसेच सदस्य सचिव पदावरील सहाय्यक आयुक्त (कौशल्य विकास) यांचे अभिनंदन केले आहे.
केंद्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्रालयाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा कौशल्य विकास नियोजनातील उत्कृष्टतेसाठी 2020-2021(Award of Excellence in District Skill Development Planning-DSDP) या पुरस्कार स्पर्धेत देशातील 336 जिल्ह्यांनी सहभाग घेऊन आराखडा सादर केला होता. त्यातून प्राथमिक स्तरावर 30 जिल्ह्यांची केंद्रीय समितीसमोर सादरीकरणासाठी निवड झाली होती. त्यामध्ये राज्यातील 5 जिल्ह्यांच्या कौशल्य विकास कृती आराखड्याचा समावेश होता.
राष्ट्रीय पातळीवर सादरीकरणाकरीता निवड झालेल्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक जिल्हे महाराष्ट्र राज्याचे आहेत. जिल्ह्यातील विशिष्ट भौगोलिक तथा सामाजिक स्थिती, परंपरागत व्यवसाय, नैसर्गिक संसाधने तथा साधनसाम्रगी व कुशल मनुष्यबळाची मागणी असलेली क्षेत्रे निश्चित करून जिल्ह्याचा वार्षिक कृत्ती आराखडा राज्यातील सर्व जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समित्यांमार्फत तयार करण्यात आला आहे.
मागील वर्षीप्रमाणे सन 2022-23 करीता सुद्धा आपण स्वत: पुढाकार घेवून जिल्ह्याचा वार्षिक कृती आराखडा तयार करावा आणि त्याची यथोचित अंमलबजावणी करून जिल्ह्यातील युवक-युवतींना कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता क्षेत्रामध्ये महत्तम संधी उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी केले आहे.
उत्कृष्ट जिल्हा कौशल्य विकास आराखडे तयार करुन स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या सर्व जिल्ह्यांचे अभिनंदन मंत्री टोपे यांनी केले असून यापुढील काळात या आरखड्यांची प्रभावी अंमलबजावणी करुन जिल्ह्यांनी जास्तीत जास्त युवक-युवतींना कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन द्याव्यात, असे आवाहन मंत्री टोपे यांनी केले आहे.