पुणे,{प्रभात वृत्तसेवा}- शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मागील पाच वर्षांतील नीचांकी पाणीसाठा शिल्लक आहे. आगामी शेतीचे आर्वतन, पुढील पाच महिन्यांसाठी शहराला आवश्यक असणारे पाणी, बाष्पीभवन या सर्वांचा विचार करून पाणी नियोजन करणे आवश्यक बनले आहे.
मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीनंतरच पाणीकपातीबाबतचा निर्णय होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. निवडणुकांमध्ये नाराजी नको, तसेच विरोधकांकडूनही पाण्याच्या विषयावर राजकारण होण्याची शक्यता धरून सत्ताधाऱ्यांकडून सध्यस्थितीत पाणी विषयाला बगल दिली असल्याचे दिसून येत आहे.
यंदा जेमतेम झालेल्या पावसामुळे खडकवासला, टेमघर, वरसगाव आणि पानशेत ही चारही धरणे कशीबशी 100 टक्के भरली. मात्र त्यानंतर परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने धरणात पुन्हा पाणीसाठा जमा झाला नाही. त्यामुळे खडकवासला प्रकल्पात कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा प्रकल्पात सुमारे तीन टीएससी इतका कमी पाणीसाठा उपलब्ध आहे.
उन्हाळ्यात पाण्याची मागणी आणखी वाढणार आहे. याबरोबरच पाणीचोरी, गळती आणि बाष्पीभवन यांमुळे धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होणार आहे. त्यामुळे लोकसभा मतदारसंघाचे मतदान पार पडल्यानंतर शहरात पाणीकपात होणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात येत आहे.
गेल्या वर्षी कडक उन्हाळ्यामुळे धरणांमधील पाणीसाठा कमालीचा घटला होता. तसेच पाऊस लांबणीवर गेल्याने आॉगस्टच्या पहिल्या आठवड्यात खडकवासला धरण भरले. यामुळे जुलैमध्ये पाणीकपात करण्याची वेळ पालिका प्रशासनावर आली होती. सप्टेंबरमध्येही समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे गेल्या वर्षी पावसाने सरासरी देखील गाठली नाही. परिणामी यंदा उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई जाणवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा
वर्ष – पाणीसाठा (टीएमसी) – टक्के
२०२४ – १५.९९ – ५४.८५
२०२३ – १८.९२ – ६४.८८
२०२२ – १७.९३ – ६१.५०
२०२१ – २०.६३ – ७०.७८
२०२० – १८.६४ – ६३.९४