- शक्य असल्यास 14 दिवस घरीच थांबा – वैद्यकीय तज्ञांचा सल्ला
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने लसीकरणावर भर देण्यात आला आहे. मात्र लस घेण्याबाबत अनेक नागरिकांमध्ये समज-गैरसमज आहेत. तसेच अनेकांना मद्यपान (दारु प्राशन) करण्याची सवय आहे. मात्र लस घेण्यापूर्वी व घेतल्यानंतर मद्यप्राशन केल्यास प्रतिकार शक्ती कमी होते. त्यामुळे लस घेणार असाल तर मद्यप्राशन करू नका, असा सल्ला वैद्यकीय तज्ञांनी दिला आहे.
शहरामध्ये 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरूवात झाली आहे. सद्यस्थितीत 45 वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येत आहे. अनेक नागरिकांमध्ये लस घ्यावी की नाही याबाबत मतभिन्नता आहे. तसेच आपण लस घेतल्यानंतर आपल्याला काही त्रास झाला तर अशीही शंका अनेकांच्या मनात आहे. याबाबत बोलताना वायसीएम रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विनायक पाटील म्हणाले, लस घेतल्यानंतर दोन ते तीन दिवस सौम्य त्रास होणे साहजिक आहे. त्याचे कारण असे की, आपण शरीरामध्ये काही जीव इंजेक्ट करत असतो. अशा वेळी घाबरून जायचे नाही.
लसीकरण केंद्रावर आपल्याला ओआरएस आणि काही गोळ्या देतात त्या दोन दिवस घेतल्या की हा त्रास कमी होतो. दुसरी अत्यंत मह्त्वाची गोष्ट म्हणजे लस घेतल्यानंतर सौम्य लक्षणे असलेल्या करोना रुग्णांची जशी काळजी घेतो तशी काळजी घेणे आवश्यक आहे. तर लस घेतल्यानंतर आपण 14 दिवस घरीच थांबणे आवश्यक आहे. करोना झाल्यानंतर आपण होम आयसोलेशनमधील रुग्णांची जशी काळजी घेतो. तशीच काळजी आपण स्वतःची घ्यायची आहे. त्यामध्ये घरच्या घरी वॉकिंग टेस्ट करणे, ऑक्सिजनची पातळी तपासणे आवश्यक आहे.
कोणत्याही वेळी मद्यपान करणे शरीरासाठी अपायकारकच आहे. लस घेण्यापूर्वी व घेतल्यानंतर मद्यपान केल्यास शरीतील प्रतिकार शक्ती कमी होते. तसेच लसीच्या डोसाची व मद्याची काही रासायनिक प्रक्रिया होऊन शरीरावर त्याचा दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लस घेण्यापूर्वी व घेतल्यानंतर किमान दोन दिवस तरी मद्यपान वर्ज्य करावे, असा सल्ला डॉ. पाटील यांनी दिला.
सामाजिक अंतर ठेवा
लस घेतल्यानंतर शरीरामध्ये लगेच अँटीबॉडीज तयार होत नाहीत. त्यासाठी किमान एक ते दीड महिन्यांचा कालावधी लागतो. तसेच दुसरा डोस घेतल्यानंतरही सर्वांना पंधरा दिवस काळजी घेणे आवश्यक आहे. ज्यावेळी नागरिक लस घेण्यासाठी केंद्रावर जातात. त्याठिकाणी सामाजिक अंतराचे (सोशल डिस्टन्सिंग) पालन करत नाहीत. लसीकरण केंद्रावर एखादा पॉझिटिव्ह नागरिक आला तर त्यापासून संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे.