सिडनी – करोना व्हायरसच्या फैलावामुळे पसरलेल्या कोविड-19च्या प्रादुर्भावाच्या सावटाखाली भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरू असताना आता प्रत्यक्ष मालिका सुरू व्हायची वेळ आली, तरीही कोणता खेळाडू कोणत्या प्रकारात खेळणार आणि कोण फलंदाज कोणत्या क्रमांकावर खेळणार, याबाबत अजूनही अनिश्चिततेचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे. अशातच रोहित शर्मा आणि ईशांत शर्माच्या कसोटी खेळण्याबाबतची साशंकताही वाढत असल्याने संघ व्यवस्थापनासमोर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. त्यातच अनेक आजी-माजी खेळाडू संभाव्य संघाबाबत जाहीर मतप्रदर्शन करत असल्याने गोंधळात भरच पडत असल्याचे चित्र आहे.
येत्या शुक्रवारपासून या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना सिडनी येथे होणार असून त्यादृष्टीने आता काही निर्णय घेणे संघव्यवस्थापनाला भाग पडणार आहे. विराट कोहली आणि ऍरॉन फिंच एकाच संघाकडून आयपीएल सामने खेळले असले तरी आता एकमेकांविरोधात उभे ठाकताना दोघांची धोरणे काय असतील, हे पाहणेही रंजक ठरणार आहे. मर्यादित षटकांच्या संघात ऋषभ पंतचा समावेश नाही. के. एल. राहुल उपकर्णधार आणि यष्टीरक्षकाच्या भूमिकेत असल्याने त्याला कोणत्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवायचे याचा निर्णय संघ व्यवस्थापनाला घ्यावा लागणार आहे.
जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलिया भारत भेटीवर असताना ऋषभ पंत जखमी झाल्यानंतर त्याची जागा राहुलने घेतली होती आणि 52 चेंडूंत 80 धावा करत लक्षवेधी कामगिरी केली होती. न्यूझीलंडमध्येही त्याने 64 चेंडूत 88 आणि 113 चेंडूत 112 धावा करत सातत्य राखले होते. त्यामुळे यष्टीरक्षक आणि उपयुक्त फलंदाज म्हणून राहुलला वरच्या क्रमांकावर संधी द्यायची की, यष्टीरक्षणासाठी त्याला अधिक लक्ष केंद्रित करू द्यायचे हे ठरवावे लागणार आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत राहुल वरच्या क्रमांकावर आक्रमक फलंदाजी करू शकतो, अशा शब्दांत सचिन तेंडुलकरनेही राहुलला सलामीला खेळवण्याविषयी भाष्य केले आहे. शिवाय धवनसमवेत सलामीला खेळण्याची संधी राहुल गमावणार नाही, असा अंदाज आहे.
मयंक व शुभमनचे काय?
जर के. एल. राहुलला सलामीला खेळवायचे नसेल, तर भारताकडे मयंक आगरवाल आणि शुभमन गिल असे पर्याय उरतात. याआधी पृथ्वी शॉचा पर्याय होता. पण सध्या तो संघातच नसल्याने सूर गवसलेल्या धवनला समर्थ साथ मयंक देईल की शुभमन, यावर भारताच्या डावाची भिस्त असेल. आगरवालने 11 आयपीएल सामन्यांत 156.4 च्या स्ट्राईक रेटने एका शतकासह 424 धावा केल्या आहेत, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
त्याच्या उलट गिलने 14 सामन्यांत 117.96 च्या स्ट्राईक रेटने 440 धावा करताना आपली उपयुक्तता सिद्ध केली आहेच. जसप्रित बुमराह आणि मोहम्मद शमीवर वेगवान गोलंदाजीची धुरा असेलच, शिवाय शार्दूल ठाकूरही उपयुक्त ठरू शकतो. त्याशिवाय नवदीप सैनीलाही संधी मिळाल्यास तोही चमक दाखवू शकतो, असे मानले जात आहे.