पिंपरी (प्रतिनिधी) – माथाडीच्या नावाखाली, कामे किंवा भंगार मिळविण्यासाठी कंपनीला धमकावल्यास कडक कारवाईचा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला होता. त्यानंतर म्हाळुंगे परिसरात माथाडी संघटनेच्या नावाखाली खंडणी घेताना पाच जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे माथाडी वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
अजय शंकर कौदरे (वय 39), प्रदीप रामचंद्र सोनावणे (वय 32, दोघेही रा. मु. पो. खारोशी, ता. खेड, जि. पुणे), गणेश दशरथ सोनावणे (वय 33, रा. कुरूळी, ता. खेड, जि. पुणे), स्वप्नील अजिनाथ पवार (वय 29, रा. एकतानगर, चाकण) आणि धोंडिबा ऊर्फ हनुमंत विनायक वडजे (वय 32, रा. मेदनकरवाडी, चाकण) अशी अटक करण्यात आलेलया आरोपींची नावे आहेत.
20 ते 23 तारखेच्या दरम्यान काहीजणांनी एका कंपनीत येऊन धमकी दिली की, कंपनी चालवायची असेल तर वेदांत एटरप्रायझेस नावाच्या कंपनीच्या एका प्रतिनिधीला कामावर घ्या, तो कामावर येणार नाही मात्र त्याचा पगार व इतर देणी असे मिळून दरमहा 20 हजार रुपये द्यावे लागतील. नाहीतर तुमची विकेट काढेल, अशी धमकी दिली. याप्रकरणी कंपनीच्या प्रतिनिधींनी म्हाळुंगे पोलीस चौकीत तक्रार दिली.
पोलीस आयुक्त यांच्या निर्देशानुसार व पोलीस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली म्हाळुंगे पोलिसांनी सापळा रचून 20 हजारांची खंडणी घेताना माथाडी संघटनेचा अध्यक्ष अजय कौदरे, प्रदीप सोनावणे आणि गणेश सोनावणे या तिघांना जागेवरच अटक केली. आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे स्वप्नील पवार आणि धोंडिबा वडजे या दोघांनाही अटक केली.
उद्योजकांनी तक्रार देण्यासाठी पुढे यावे
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील भंगार माफिया, माथाडी कामगार किंवा स्थानिकांकडून उद्योजकांना होणारी दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा दिला होता. तसेच संबंधितांवर प्रसंगी मोकाचीही कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार म्हाळुंगे पोलीस चौकीच्या अधिकाऱ्यांनी उद्योजकांची बैठक घेतली होती. तसेच असा प्रकार घडल्यास याबाबत तक्रार देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते.
यामुळे म्हाळुंगे परिसरातील उद्योजक आता तक्रार देण्यासाठी पुढे येऊ लागले आहेत. अटक केलेल्या आरोपींनी किंवा इतर कोणत्याही टोळीकडून आणखी कोणाला धमकावून खंडणी घेत असल्यास त्यांनी तक्रार देण्यासाठी निर्धास्तपणे पुढे यावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी केले आहे.