Generic Medicines – केंद्र सरकारच्या सातत्याच्या प्रयत्नांमुळे जेनेरिक औषधांच्या संदर्भात सर्वसामान्य नागरिकांची धारणा आता बदलू लागली आहे. सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या जन औषधी केंद्रांच्या विक्रीत आता वाढ होते आहे. देशभरातील किमान ४० टक्के लोकांनी आता ब्रॅंडेड औषधांऐवजी जेनेरिक औषधांना प्राधान्य देण्यास सुरूवात केली असल्याचे एका अहवालाच्या आधारे पश्चिम बंगालमधील औषध वितरकांनी म्हटले आहे.
सेंट्रम इन्स्टिट्यूशनल रिसर्च या संस्थेचा हा अहवाल आहे. त्यानुसार आता जेनेरिक औषधांच्या बाबतीत लोकांचे विचार आता बदलू लागले आहेत. या औषधांच्या विक्रीत हळूहळू वाढ होते आहे. वाढती मागणी आणि जन औषधी केंद्रांच्या संख्येत झालेली वाढ पाहता ही औषधे आणखी स्वस्त होण्याची शक्यताही आता वर्तवली जाते आहे. आताच जेनेरिक औषधांच्या किमती ब्रँडेड औेषधांच्या तुलनेत ५० ते ६० टक्के कमी आहेत.
काय आहे सरकारचे लक्ष्य?
२०२६ या वर्षाच्या अखेरपर्यंत जन औेषधी केंद्रांची संख्या वाढवून ती २५ हजार पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे. सध्या देशातील ७५३ जिल्ह्यांमध्ये १०,३७३ केंद्र आहेत. या केंद्रांवर रोज १० लाख लोक औषधे खरेदी करतात. २०२३ या वर्षात या केंद्रांमधून १२३६ कोटी रूपयांची औषध विक्री झाली आहे.
ब्रँडेड औषधांऐवजी या औषधांना प्राधान्य देऊन नागरिकांनी स्वत:च्या ७४१६ कोटी रूपयांची बचत केली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत आज जेनेरिक औषधांची भागिदारी ४ ते ४.५ टक्के आहे. उत्तर प्रदेशात देशातील सर्वाधिक १४८१ केंद्रे आहेत.
जेनेरिक औषधांचा वाढता उपयोग हे सरकारचेही मोठे यश मानले जाते आहे. यामुळे औषधांच्या किमती कमी होतील आणि लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होतील असा विश्वास सरकारला वाटतो आहे.
जेनेरिक औषधे म्हणजे काय?
मूळ ब्रँडेड औषधांमध्ये जे घटक असतात त्याचसमान घटकांपासून जेनेरिक औषधे तयार केली जातात. मूळ ब्रँडेड औषधांप्रमाणेच या औषधांचाही प्रभाव असतो. मात्र त्यांचे मूल्य हे ब्रँडेडपेक्षा फार कमी असते.
जेनेरिक औषधांचे फायदे
१. स्वस्तात उपलब्ध होतात.
२. मूळ औषधांसारखीच प्रभावी असतात.
३. जेनेरिक औेषधे सहज उपलब्ध होतात.
मात्र जेनेरिक औषधांचा वापर करण्यापूर्वी अगोदर डॉक्टरांशी चर्चा करणे गरजेचे असते. तसेच त्यांची एक्स्पायरी डेट तपासून घेणेही आवश्यक असते. या औषधांचा साठा करण्यासाठी योग्य तापमान आणि आर्द्रता ध्यानात घेणे आवश्यक आहे.