हेमंत देसाई
प्रसिद्ध शेअर गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची सपत्निक भेट घेतली. त्यामुळे चर्चांना एकच उधाण आले.
खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून या भेटीचा फोटो शेअर केला आणि झुनझुनवाला यांचे तोंड भरून कौतुक केले. चैतन्यशील, प्रश्नांची जाण असलेला आणि भारताबद्दल “बुलिश’ असलेला “माणूस’, असा त्यांचा उल्लेख मोदींनी आपल्या ट्विटमध्ये केला. खुद्द राकेश हे खुर्चीवर बसलेले आहेत आणि मोदीजी त्यांच्याबरोबर उभे राहून बोलत आहेत, असा फोटोही व्हायरल झाला. लगेच, “सर, ये कौनसा तरीका है? प्रधानमंत्री के पद की कोई गरीमा नहीं रखी’
अशा प्रकारच्या कमेंट्स सोशल मीडियावर येऊ लागल्या. मोदी सरकारवर पूर्वी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी “सूटबूट की सरकार’ अशी टीका केली होती. या घटनेच्या निमित्ताने त्याची आठवण झाली; परंतु झुनझुनवाला आपल्या प्रकृतीच्या कारणास्तव खुर्चीवर बसून होते, असा खुलासा झाल्यानंतर या टीकेत कोणताही अर्थ नसल्याचे स्पष्ट झाले.
देशाला उद्योग व उद्योगपतीची गरज असते. त्यामुळे त्यांच्यावर पूर्वग्रहातून टीका करणे योग्य नाही, असे पंतप्रधानांनी याआधीच स्पष्ट केले आहे. सर्वच व्यापारी व उद्योगपती हे चोर आहेत, असे मानून त्यांच्याशी तसा व्यवहार करणे, हा मूर्खपणा आपण वर्षानुवर्षे केला. तसा तो करण्याचे बिलकुल कारण नाही. 2004 साली जेव्हा कॉंग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार आले, तेव्हा त्यास बाहेरून कम्युनिस्टांचा पाठिंबा होता.
त्यामुळे हे सरकार येणार, असे म्हटल्याबरोबर तेव्हा शेअर बाजार कोसळला. त्यावेळी “शेअर बाजार खड्ड्यात गेला तरी हरकत नाही’, असे “बाणेदार’ उद्गार एका कम्युनिस्ट नेत्याने काढले होते. मात्र, अर्थव्यवस्थेला शेअरबाजाराची आवश्यकता असतेच. शेअर बाजारात जेव्हा भांडवल आकर्षित होते, तेव्हाच अर्थव्यवस्थेची भरभराट होऊ शकते. अर्थात, गेल्या काही वर्षांत केंद्र सरकारने केलेल्या आर्थिक सुधारणांबाबत झुनझुनवाला यांनी कौतुक केले आहे.
अशावेळी लपूनछपून नव्हे, तर थेटपणे व जाहीरपणे त्यांना भेटणे, यात काहीही चूक नाही. झुनझुनवाला हे “आकाश एअर’ ही हवाई सेवा सुरू करत असून, त्यासाठी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. आता या मंत्रालयाच्या महासंचालकांकडून एअर ऑपरेटर परमिट मिळावे, यासाठी ते अर्ज करतील आणि पुढील उन्हाळ्यात “आकाश’ची विमाने आकाशात उड्डाण करतील.
एसएनव्ही एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेडतर्फे “आकाश एअर’ ही सेवा सुरू करण्यात येत असून, या क्षेत्रातील अनुभवी असे विनय दुबे हे कंपनीचे मुख्याधिकारी असतील. ही सेवा अल्पदरातील असेल. त्याकरिता बोईंग 737 मॅक्सची तसेच एअरबसची ए 320 ची काही विमाने आणली जाणार आहेत.
करोनाचे निर्बंध आता जवळपास शिथिल झाले असून, 18 ऑक्टोबरपासून देशांतर्गत विमानसेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास, हवाई वाहतूक कंपन्यांना पूर्णपणे परवानगी देण्यात आली आहे. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने व सणासुदीचा हंगाम असल्याने, प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. दैनंदिन हवाई प्रवासी वाहतुकीने तीन लाखांचा टप्पा ओलांडला आहे.
पुढील वर्षात टाटा समूहातील एअर इंडिया व ए आय एक्सप्रेस तसेच जेट एअरवेजची विमानेही सेवा सुरू करणार आहेत. अर्थात, कच्च्या तेलाचे चढे भाव आणि रुपयाचा प्रतिकूल विनिमयदर या अडचणींना त्यांना सामोरे जावे लागेल.
राकेश झुनझुनवाला हे अत्यंत हुशार असून, त्यांना केवळ शेअर बाजारपेठेचाच नव्हे तर एकूणच विविध उद्योग व सेवांचा भविष्यकालीन अंदाज नेमकेपणाने बांधता येतो. ते स्वतः राजस्थानी कुटुंबातील असून, त्यांचे वडील प्राप्तिकर आयुक्त होते. ते मुंबईतील सिडनेहॅम कॉलेजचे विद्यार्थी असून, ते चार्टर्ड अकाउंटंट आहेत. त्यांची स्वतःची रेअर एंटरप्राइझेस नावाची मालमत्ता व्यवस्थापन कंपनी आहे. ऍपटेक लिमिटेड आणि हंगामा डिजिटल एंटरटेनमेंट प्रा. लि. या कंपन्यांचे राकेश हे अध्यक्ष आहेत.
त्याचबरोबर प्राज इंडस्ट्रीज, प्रोव्होग इंडिया, मिड डे मल्टिमीडिया, नागार्जुन कन्स्ट्रक्शन, टॉप सिक्युरिटी अशा कंपन्यांचे ते संचालक आहेत. राकेश यांना भारताचे वॉरेन बफे असे समजले जाते. बफे हे जगप्रसिद्ध गुंतवणूकदार असून, शेअर, रोखे व कमॉडिटी बाजारात त्यांची अब्जावधींची गुंतवणूक आहे. गेली अनेक वर्षे बिझिनेस चॅनेल्सवरून राकेश यांचा विविध कंपन्यांतील गुंतवणूक सल्ला लाखो लोकांना ऐकायला मिळत आहे. 1986 साली त्यांना शेअर गुंतवणुकीतून पहिल्या प्रथम पाच लाख रुपये मिळाले.
तीन वर्षांत हा आकडा 25 लाख रु. वर गेला आणि आज त्यांच्याकडे 20 ते 25 हजार कोटी रु.ची संपत्ती असल्याचे सांगण्यात येते. त्यापैकी टायटन या एकाच कंपनीत राकेश यांची सात हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक आहे. स्टार हेल्थ इन्शुरन्स, मेट्रो ब्रॅंड्स, तसेच कॉनकॉर्ड बायोटेक या कंपन्यांत त्यांचे भागभांडवल आहे. राकेश यांच्यापासून प्रेरणा घेऊन, शेकडो
लोकांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने गुंतवणूक केली असून, बक्कळ फायदाही कमावला आहे. प्रत्येक कंपनीचे विश्लेषण करून, त्यात केव्हा पैसे टाकावेत व केव्हा काढून घ्यावेत याचे अंदाज बांधता येतात. माणसाला योग्य मार्गानेदेखील श्रीमंत बनता येते. याची जाण अलीकडील पिढीला होऊ लागली आहे.
अर्थात, गेल्या वर्षी एका प्रकरणात राकेश यांनी इनसायडर टेडिंग केल्याचा आरोप होता. परंतु सेबीने तो वाद मिटवला आहे. अशा वादग्रस्त गोष्टींचे समर्थन कोणीही करता कामा नये. प्रत्येक व्यक्तीत दोष हे असतातच; परंतु राकेश झुनझुनवाला यांनी जवळजवळ शून्यातून जे विश्व साकारले, ते कौतुकास्पद असून, त्याचे स्वागतच केले पाहिजे.