टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा सध्या संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळली जात आहे. या स्पर्धेतील सर्वात महत्त्वाचा सामना 24 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान या परंपरागत प्रतिस्पर्धींमध्ये खेळवला जाणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने भारत आणि पाकिस्तान यांचे खेळाडू, माजी खेळाडू आणि क्रिकेट तज्ज्ञ एकमेकांवर टीका करून मनोवैज्ञानिक युद्ध लढण्याचा प्रयत्न करत असले तरी तो या खेळाचा एक भाग आहे.
मात्र, या खेळाच्या निमित्ताने जे एक राजकारण खेळले जात आहे त्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. गेल्या काही दिवसांमध्ये काश्मीरमधील हिंसाचार प्रचंड प्रमाणात वाढल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानशी हा क्रिकेट सामना खेळू नये अशा प्रकारची मागणी आता जोर धरू लागली आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून काम करणारे गिरीराज सिंग यांनी सर्वात प्रथम ही मागणी केली.
त्यानंतर शिवसेनेचे नेते तसेच राज्यसभेचे सदस्य संजय राऊत यांनीही या मागणीला दुजोरा दिला आणि आता एमआयएमचे खासदार ओवेसी यांनीसुद्धा काश्मीरमध्ये सैनिक मरत असताना भारत-पाकिस्तान सामना होण्याची गरज आहे का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. अर्थात, कितीही राजकारण केले गेले तरी भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील हा सामना रद्द होणार नाही याची जाणीव सर्वांनाच आहे.
बीसीसीआयचे एक पदाधिकारी राजीव शुक्ला यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने ठरवलेल्या कोणत्याही स्पर्धेतून कोणत्याही देशाला अचानक माघार घेता येत नाही. भारतालाही पाकिस्तान विरुद्धचा हा सामना आम्ही खेळणार नाही, असे आता ऐनवेळी सांगता येणार नाही. पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव म्हणून कार्य करणारे जय शहा हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे चिरंजीव असल्याने या निमित्ताने अमित शहा यांना लक्ष्य करण्याचे काम केले जात आहे.
गृहमंत्री अमित शहा आपल्या इतर मंत्री सहकाऱ्यांच्या मदतीने दहशतवाद्यांशी लढण्याचे काम करत असताना दुसरीकडे त्यांचा मुलगा भारत-पाकिस्तान सामन्याचे नियोजन करीत आहे, हा विरोधाभास या निमित्ताने राजकीय विरोधकांना दाखवून द्यायचा आहे. खेळामध्ये कधीच राजकारण आणू नये याबाबत सर्वच राजकीय पक्षांचे एकमत असते; पण या निमित्ताने केंद्रातील भाजप सरकारवर टीका करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
अर्थात, याची सुरुवात केंद्रातील भाजपाच्या एका मंत्र्याने केली आणि त्याला दुजोरा भाजपचेच नेते असलेले सुब्रमण्यम स्वामी यांनीही दिला आहे हेसुद्धा विसरून चालणार नाही. फक्त विरोधी पक्ष त्यामध्ये राजकारण आणत आहेत, असे काही म्हणता येणार नाही. भाजपमध्येही काही नेत्यांची भावना भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये सामना होऊ नये अशाच प्रकारची आहे हेसुद्धा महत्त्वाचे आहे. अर्थात, पाकिस्तानशी संबंधित खेळ म्हटला की, या ठिकाणी क्रिकेटच का लक्षात घेतले जाते हासुद्धा संशोधनाचा विषय आहे.
कारण काही महिन्यांपूर्वी जेव्हा ऑलिम्पिक सामने पार पडले, तेव्हा ज्या स्पर्धेमध्ये नीरज चोप्राने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते त्या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये नीरज चोप्राच्या बाजूला एक पाकिस्तानचा खेळाडू अंतिम फेरीमध्ये आपले कौशल्य दाखवत होता. भारताचा एक युवा क्रिकेटपटूंचा संघही नुकताच पाकिस्तानचा दौरा करून आला असून त्या ठिकाणी आम्हाला अतिशय चांगली वागणूक मिळाली,
अशा त्यांच्या प्रतिक्रिया प्रसिद्ध झाल्या आहेत. भारत-पाकिस्तान यांच्यामधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट नेहमीच स्पर्धेच्या आणि धर्म युद्धाच्या भावनेने खेळले जात असल्याने त्याच भावनेतून हा सामना होऊ नये, असे म्हटले जात असावे. खरेतर या निमित्ताने जय शहा यांना लक्ष्य केले जात आहे. जय शहा यांची नुकतीच आशियाई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे आणि आगामी आशियाई विश्वचषक क्रिकेट स्पर्धा पाकिस्तानमध्ये खेळली जाईल,
अशीही शक्यता आहे. अशा वेळी क्रिकेट नियामक मंडळाचे पदाधिकारी किंवा राजकारणी नेते यांच्याकडून कोणती भूमिका घेतली जाईल हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. गेल्या सुमारे दहा वर्षांपेक्षा जास्त कालावधीत भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये त्यांच्या त्यांच्या देशात कोठेही मालिका झालेली नाही. हे देश नेहमीच एखाद्या त्रयस्थ देशांमध्ये समोरासमोर आले आहेत. आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणार आहे.
भारतासह सर्व देशांनी पाकिस्तानमधील क्रिकेटवर बहिष्कार घातल्याने पाकिस्तान क्रिकेटचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड या संघांनी नुकतेच आपले पाकिस्तानचे दौरा अचानक रद्द केल्याने त्यालाही पाकिस्तानने भारतालाच जबाबदार धरले आहे. पाकिस्तानमधील परिस्थिती अद्यापही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी अनुकूल नाही हे वास्तव जगातील सर्वच क्रिकेट संघांना माहीत असल्याने कोणीही त्या देशांमध्ये क्रिकेट खेळण्यास उत्सुक नाही;
पण काश्मीरमध्ये पाकिस्तान पुरस्कृत हालचालींना वेग आला असल्याने केवळ त्या कारणासाठी असा ऐनवेळी भारत आणि पाक सामना रद्द होऊ शकतो का, याचाही विचार करावा लागणार आहे. आयसीसी जेव्हा कोणतीही विश्वचषक स्पर्धा भरवते तेव्हा त्याचे काही ठराविक नियम असतात. ते नियम सर्वांनाच पाळावे लागतात. मुळात ही विश्वचषक स्पर्धा भारतात होणार होती; पण भारतातील करोना परिस्थितीमुळे ती अमिरातीत खेळवण्यात येत आहे.
त्यामुळे जर भारतात ही स्पर्धा खेळवण्यात आली असती, तर पाकिस्तान संघाला भारतात प्रवेश देण्यात आला असता का, हा पण एक संशोधनाचा मुद्दा ठरला आहे. जर भारतीय संघाने भारतात पाकिस्तानशी खेळण्यास नकार दिला असता तर ते समजण्यासारखे झाले असते; पण आता त्रयस्थ ठिकाणी या दोन देशांमध्ये सामने होणार असल्याने विनाकारण राजकारण करण्यात काहीच हशील नाही. कारण काहीही झाले तरी हा सामना रद्द होणार नाही.
भारतीय संघाला आपला नैसर्गिक खेळ खेळून या सामन्यांमध्येही पाकिस्तानला धूळ चारावी, अशी भारतीय संघाला शुभेच्छा देण्याची गरज आहे. आतापर्यंत सर्वच विश्वचषक स्पर्धांमध्ये भारताने पाकिस्तानला हरवले असल्याने तोच इतिहास 24 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सामन्यांमध्ये कायम राहील, असे संकेत आता मिळत आहेत. त्यामुळे या विषयामध्ये राजकारण आणून भारतीय खेळाडूंचे मन विचलित करण्यात काहीच अर्थ नाही.