– आकाश वशिष्ठ
सध्याचे राजकारण फक्त लाभाच्या पदांसाठीच असते. आपल्या महत्त्वाकांक्षांच्या पूर्ततेसाठी असते व त्याकरता काहीही तडजोड केली जाते आणि त्याचे समर्थनही केले जाते.
आपल्या देशाच्या राजकारणात विचारधारेला खूप महत्त्व असल्याचे म्हटले जाते. पक्षांतर्गत लोकशाही आहे असेही प्रत्येक पक्ष म्हणतो. गरीब, दलित, महिला आणि अल्पसंख्याकांच्या प्रगतीचे दावे सगळे पक्ष करतात. हे सगळे बोलण्यापुरतेच असते का, हा प्रश्नच. त्याचे कारण ज्या पक्षात आहोत त्या पक्षात आपली चलती आहे किंवा आपल्याला महत्त्व आहे अथवा आपल्या शब्दाला किंमत आहे, असे जोपर्यंत वाटते तोपर्यंतच हे दावे असतात. आपल्या हिताला धक्का पोहोचला की सगळे एका रात्रीत फिसकटते. मग ज्याला कालपर्यंत जातीयवादी म्हणून हिणवले होते त्याला रेड कार्पेट टाकली जाते. ज्याला भ्रष्टाचारी म्हटले होते त्याच्याशी हातमिळवणी केली जाते. ज्याच्यावर घराणेशाहीचे आरोप केले होते त्याची गळाभेट घेतली जाते आणि तीच घराणेशाही कशी पावन आहे याचे गोडवे गायले जातात. या सगळ्याचे बारकाईने निरिक्षण केले तर एकच समजते, ते म्हणजे याचा आणि विचारधारेचा सूतराम संबंध नाही. त्याच्याशी कोणाला सोयरसूतकही नाही.
कर्नाटकात विधानसभेची निवडणूक आहे. ती लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर होत असल्यामुळे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या राज्याचे दुखणेही मोठे अवघड आहे. पूर्वी येथे कॉंग्रेस एकमेव प्रबळ पक्ष होता. यथावकाश कॉंग्रेसमधून फुटलेली मंडळी एकत्रित झाली. नंतर जनता दल उभा राहिला. जनता दलाचे किती तुकडे झाले याची त्यांनीच मोजणी केली नसणार. किंबहुना त्यांना त्याची फिकिरही नाही. जे जे जनता दलातून बाहेर पडले त्यांनी आपल्या वाटणीची चादर ओढून नेली. त्याला मग त्यांनी जनता दलच नाव दिले. फक्त त्या नावाच्या सुरुवातीला आपले काहीतरी वेगळे उपरणे घातले. प्रत्यक्षात जे लोक आपल्या वाटणीची चादर ओढून तेथून बाहेर पडले होते त्यांनी केवळ आपण, आपला परिवार आणि आपले भक्त एवढेच पाहिले. त्यांनी विचारधारेचा मुलामा या सगळ्या फुटींना आणि विभक्तीकरणाला दिला खरा, मात्र आतून सगळे सारखेच. याच कर्नाटकात भारतीय जनता पार्टी नावाचा एक राष्ट्रीय पक्ष उदय पावला. मुख्यत: कथित उच्चवर्गियांचा हा पक्ष असल्याची त्यांच्यावर टीका केली जाते. त्यामागे त्यांची विचारधारा असल्याचे कारण सांगितले जाते. प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष हा हिंदी भाषिक राज्यांतील पक्ष.
त्याचे कारण त्यांचे रामजन्मभूमीचे आंदोलन तेथून सुरू झाले व तेथेच त्याला बळ मिळाले. दक्षिणेकडची राज्ये तुलनेने त्यापासून अलिप्त. त्यांची प्रत्येकाची वेगळी अस्मिता आणि वेगळी परंपरा. अन्य पक्षांना मात देत किंवा त्यांच्या त्याच त्या चेहऱ्यांना कंटाळलेल्या जनतेला हात घालत भाजपने या राज्यात आपले बस्तान बसवले. सरकारही स्थापन केले. जातींच्या समीकरणांची मांडणीही बसवली. त्यात एका प्रभावशाली जातीच्या नेत्याला त्यांनी राज्याची धुरा सोपवली. हा नेता म्हणजे येडियुरप्पा एका विशिष्ट वर्गाचे एकमुखी नेते असल्याचे चित्र निर्माण झाले किंवा केले गेले. अन्य दोन पक्ष म्हणजे कॉंग्रेस आणि कॉंग्रेसमधील फुटीतून आलेला जनता दल. यातील जनता दलाची धर्मनिरपेक्ष शाखा कर्नाटकात कार्यरत आहे. अन्य राज्यांत ती संयुक्त, बीजू, राष्ट्रीय आदी नावांनी कार्यरत आहे. मुळात हे सगळे एकाच संयुक्त जनता परिवारातील सदस्य आहेत. कॉंग्रेसला विशिष्ट मुद्द्यावर विरोध करून त्यांनी वेगळी चूल मांडली. आता ती चूल आहे मात्र जे मुद्दे कॉंग्रेसच्या विरोधात उपस्थित केले होते ते त्या चुलीत कधीच इंधन म्हणून टाकून दिले आहेत.
थोडक्यात, विचारधारा वगैरे प्रकार काही राहिलेला नाही. जे नेते आहेत ते इकडचे असोत वा तिकडचे, त्यांना त्यांचा स्वार्थ खुणावतो आहे. निवडणुकीनंतर कोण होणार मुख्यमंत्री हा तो स्वार्थ. नाही मुख्यमंत्री होता आले तर किमानपक्षी मंत्री तरी, किमान सत्ताधारी पक्ष तरी, हा सगळा मामला आहे. कर्नाटकातील तिनही प्रमुख पक्षांचे नेतृत्व करणारे आज मुख्यत: एकाच विचारधारेचे आहेत. 1996 मध्ये कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर स्थापन झालेल्या संयुक्त मोर्चा सरकारचे नेतृत्व करण्याची लॉटरी एच. डी. देवेगौडा यांना लागली. ते पंतप्रधान झाले. त्यांची राजकीय उंची वाढली. ती देशात किती वाढली हा संशोधनाचा विषय, मात्र कर्नाटकातील ते मोठे नेते झाले. त्यांची गादी आता त्यांचे पुत्र कुमारस्वामी सांभाळत आहेत. मोठ्या नेत्याचा धर्मनिरपेक्ष जनता दल आज केवळ एका कुटुंबाचा पक्ष म्हणून मर्यादित राहिला आहे. दोन-तीन जिल्ह्यांत त्यांची ताकद. त्यात मिळणाऱ्या 25 ते 35 जागा. पण भाजप आणि कॉंग्रेसच्या हाणामारीत तेच किंगमेकर ठरत असल्यामुळे त्यांचे अस्तित्व आबाधित आहे व निवडणुकीच्या काळात या पक्षाला सुगीचे दिवस येतात.
कॉंग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा सिद्धरामैय्या हेही याच जनता दलाचे. कधीकाळी देवेगौडांच्या सावलीत राहणारे. नंतर त्यांनी कॉंग्रेसशी घरोबा केला. मुद्दा अर्थातच विचारधारेचा. कॉंग्रेसचा केंद्रातील भ्रष्टाचार आणि घराणेशाही हेच जनता दलाच्या निर्मितीचे कारण. तेच कर्नाटकात होत असल्यामुळे सिद्धरामैय्याही पोळले गेले. फार विलंब होण्याच्या आत त्यांनी कॉंग्रेसचा हात पकडला आणि मुख्यमंत्रिपदाची खुर्चीही पटकावली. तिसरा पक्ष भाजप. या पक्षाचे तसे राज्यातील भिष्म पितामह येडियुरप्पा. मात्र त्यांच्यावर बरेच आरोप झाले व चेहऱ्यावरचा शेंदूरही पुरता खरवडला गेला. त्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध जावे लागले. अगोदरच्या टर्ममध्येही त्यांना असंतोषाचा सामना करावा लागला. त्यात जगदीश शेट्टर यांना मुख्यमंत्री करणे आदी प्रयोग झाले. आता शेट्टर यांचे तिकीटच भाजपने कापले.
त्यांना विचारधारेची आठवण झाली की नाही माहिती नाही, मात्र महत्त्वाकांक्षा जागृत झाली. ते कॉंग्रेसच्या तंबूत दाखल झाले आहेत. भाजपचे सवदी नावाचे आणखी एक माजी उपमुख्यमंत्री कॉंग्रेसच्या विचारधारेला कवटाळते झाले आहे. बरे भाजप ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढतो आहे ते बसवराज बोम्मईही काही भाजपचे आपले अपत्य नाही. तेही मूळचे जनता दलाचे. बोम्मई यांचे पिता केवळ कर्नाटकचे मुख्यमंत्रीच नव्हते तर जनता दलाचे राष्ट्रीय पातळीवरचे मोठे नेते होते. त्यांच्या सरकारच्या संदर्भातील खटला सर्वोच्च न्यायालयाच्या पथदर्शी निवाड्यात आजही प्रमाण मानला जातो.
थोडक्यात, कर्नाटकात आज जी तीन नावे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून समोर आहेत त्या तिघांचे उगमस्थान एकच आहे. त्यांची विचारधारा एकच आहे. ती कधीही बदलू शकते कारण त्यांची महत्त्वाकांक्षा एकच आहे. सिद्धरामैय्या असोत, कुमारस्वामी असोत किंवा बोम्मई असोत यांचे लक्ष्य कर्नाटकचे नेतृत्व करणे हेच आहे. केवळ हीच मंडळी नाहीत, तर राज्यात इतरही गुडघ्याला बांधून बसलेल्या अनेक नेत्यांनी अनेक वेळा पक्षांतर केले आहे. त्यामुळे या नेत्यांनी विचारधारेच्या गप्पा मारणे तसे गंमतीशीरच आहे. अशा नेत्यांमुळेच भारतातील लोकशाहीला निरनिराळ्या उपमाही दिल्या जातात व त्या निश्चितच भूषणावह नाहीत. कारण आपल्या देशात अनेक नेते असे आहेत की त्यांची विचारधारा सत्तेच्या प्रवाहात अगदी सहजपणे मिसळून जाते. तसेच त्यांच्या स्वार्थाला बाधा निर्माण होत असेल किंवा तसे काही होण्याचा त्यांना अंदाज जरी आला तरी ते आहे त्या प्रवाहातून बाहेर पडत नव्या प्रवाहात समाविष्ट होऊन जातात. वास्तविक ही विचारधारा नसते असते ती केवळ महत्त्वाकांक्षा.