नवी दिल्ली -दहशतवाद्यांविरोधात केवळ दिखाऊ स्वरूपाची कारवाई करून पाकिस्तान आंतरराष्ट्रीय समुदायाला हूल देण्याचा प्रयत्न करत असल्याचे भारताने म्हटले आहे. मुंबई हल्ल्यांचा सूत्रधार हाफिज सईद आणि त्याच्या साथीदारांविरोधात पाकिस्तानात गुन्हे दाखल करण्यात आल्याच्या घडामोडीवर भारताने तीव्र प्रतिक्रिया दिली.
पाकिस्तानकडून दहशतवादाविरोधात उचलण्यात येणाऱ्या वरवरच्या पाऊलांवरून आपण आपली फसवणूक करून घेऊ नये, असेही भारताने म्हटले. आंतरराष्ट्रीय समुदायाकडून टाकल्या जाणाऱ्या दबावामुळे पाकिस्तान दहशतवादाविरोधात पाऊले उचलत असल्याचे जगाला भासवतो. मात्र, पाकिस्तानकडून होणारी कारवाई म्हणजे केवळ दिखावा असतो.
दहशतवादाविरोधात लढण्याच्या बाबतीत पाकिस्तान गंभीर नाही, अशी भूमिका सातत्याने मांडत भारत त्या देशाची लक्तरे वेशीवर टांगत असतो.