कोल्हापूर – सोशल मीडियावर 80 हजार बनावट खाती उघडून त्या माध्यमातून अनेक गैरप्रकार केल्याचे अमेरिकेतील विद्यापीठाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणावरून राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न झाला.
यामागे भाजपाचा हात असल्याचेही स्पष्ट झाले आहे, असा थेट आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला.
मुश्रीफ म्हणाले, देश-विदेशामध्ये असंख्य बनावट खाती सुरू करून त्या माध्यमातून घोटाळे करण्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे. ही बनावट खाती भाजपाकडून चालवली जात होती, अशी माहितीही पुढे आली आहे. मागील अकरा महिने भाजपकडून ठाकरे परिवाराला बदनाम करणे, मुंबई पोलिसांना शिवीगाळ करणे यासारखे प्रकार या माध्यमातून केले गेले आहेत.
सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातही याच माध्यमातून असाच प्रकार झाल्याचे आता दिसत आहे. याशिवाय, याच माध्यमातून जाहिरातीचे उत्पन्न मिळवण्यासाठी “टीआरपी’ वाढवण्याचा गैरप्रकारही पुढे आला आहे. चौकशीतून या सर्व गैरप्रकारावर प्रकाश पडेल, असा विश्वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला.