जामखेड – जामखेड तालुक्यात महावितरणने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पिके जळून चालली आहेत. संतप्त झालेल्या खुरदैठण येथील लक्ष्मण भिकाजी कदम या शेतकऱ्याने चक्क शेतातील विद्युत रोहित्रावर चढून रोहित्राच्या तारा हातात घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने वीजपुरवठा खंडित असल्याने मोठा अनर्थ टळला. सरपंच, ग्रामसेवक व गावकऱ्यांनी समजूत घातल त्या शेतकऱ्यास खाली उतरविले.
अतिवृष्टी, दुष्काळ आणि गेली दोन वर्षे करोनामध्ये गेल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लगला आहे. त्यामुळे वीजबिल भरण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यंदा पाऊस चांगला झाल्याने सर्व पिके चांगली आली आहेत. यातून आर्थिक घडी बसण्याची शेतकऱ्यांना आशा होती. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये महावितरणने जामखेड तालुक्यात वीज तोडणीची मोहीम वेगाने सुरू केल्याने शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे राहिले.
पाणी असूनही अनेक शेतकऱ्यांना आपल्या पिकाला पाणी देत येत नाही. एका बाजूला महावितरण वीज तोडणीवर ठाम आहे, तर दुसरीकडे शेतकरीही याविरुद्ध आक्रमक होताना या घटनेवरून दिसून येत आहेत. महावितरण विभागाने जामखेड तालुक्यात वीजकनेक्शन तोडणी मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे खुरदैठण परिसरातील शेतकऱ्यांचे वीज बील थकल्यामुळे विद्युत रोहित्र बंद केली आहेत. खुरदैठण येथील लक्ष्मण भिकाजी कदम यांनी आपल्या शेतात ऊस लावला आहे.
तो पाणीटंचाईमुळे जळू लागला होता. त्यातच शेतकरी लक्ष्मण कदम यांच्या शेताजवळील कदम वस्ती येथील विद्युत रोहित्र वीजबील थकल्यामुळे दोन दिवसांपूर्वी बंद करून कनेक्शन कट केले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या कदम यांनी येथील विद्युत रोहित्रावर चढून चक्क विद्युत रोहित्राच्या तारा हातात घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने डीपीवरील वीजपुरवठा खंडित असल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. यानंतर सरपंच ओंकार डुचे,ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब ठाकरे, शहाजी डुचे, ग्रामसेवक इम्रान शेख, ऋषिकेश डुचे, अब्बास सय्यदसह गावकऱ्यांनी आंदोलनकर्ते कदम यांची समजूत घालून खाली उतरविले. त्यामुळे पुढील होणारा अनर्थ टळला. या घटनेची तालुक्यात चर्चा सुरू होती.