शतकाच्या अखेरीपर्यंत समुद्र किनाऱ्यावरील शहरे संकटात
लंडन: जागतिक तापमान वाढ हवामान बदल आणि जल वायू परिवर्तनाचा फटका जगातील बहुतेक पर्यावरणाला बसत असतानाच आता नवीन संशोधनाप्रमाणे याचा सर्वात मोठा फटका भारतासारख्या मोठ्या देशाला बसणार आहे. या शतकाच्या अखेरीपर्यंत भारतातील समुद्रकिनाऱ्यावर वसलेल्या अनेक शहरांना जलवायू परिवर्तनाचा मोठा फटका बसणार आहे.
हिंदी महासागराने भारताला तिन्ही बाजूने वेढले असल्याने अनेक शहरे समुद्रकिनाऱ्यावर वसली आहेत. या शहरांमध्ये आजही पाच ते सहा कोटी लोक वास्तव्य करत आहेत. या सर्व लोकांचे वास्तव्य या शतकाच्या अखेरीपर्यंत संकटात येऊ शकते असे एका नव्या अहवालात म्हटले आहे. जलवायु परिवर्तनाच्या विषयावर काम करणाऱ्या संयुक्त राष्ट्र संघाच्या इंटर गव्हर्मेंट पॅनल ऑफ क्लायमेट चेंज या संस्थेने आपल्या ताजा अहवालामध्ये हा धोका सूचित केला आहे.
या अहवालात दिलेल्या माहितीप्रमाणे, या शतकाच्या अखेरीपर्यंत मुंबई-चेन्नई गोवा यासारख्या समुद्रकिनार्यावरील शहरांचा बहुतांशी भाग पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. ग्लोबल वार्मिंगमुळे समुद्राची पातळी वाढत चालली आहे. भारताला तब्बल सात हजार 600 किलोमीटर लांबीची समुद्र किनार लाभली आहे. किनारपट्टी प्रदेशात राहणाऱ्या लोकांना दरवर्षीच आता मोठ्या प्रमाणावरील पाऊस प्रचंड तापमान याचा सामना करावा लागत आहे.
एकीकडे समुद्र किनारपट्टी वरील प्रदेशांच्या अवस्था असे असताना समुद्रकिनार्यापासून लांब असणाऱ्या प्रदेशांमध्येही तापमान वाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. वायु परिवर्तनाचा आणि ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम म्हणूनच गेल्या काही वर्षांमध्ये भारतासारख्या देशांमध्ये सर्वच ऋतू अतिशय टोकाचे हवामान दाखवत आहेत, त्यामुळे थंडीच्या कालावधीमध्ये अतिशय जास्त थंडी आणि पावसाळ्यात अतिवृष्टी आणि उन्हाळ्यामध्ये सहन न होणारे तापमान अशा प्रकारच्या ऋतूंचा अनुभव आता सर्वसामान्य नागरिकांना घ्यावा लागत आहे. तापमान वाढीमुळे हिमालय क्षेत्रातील बर्फ वितळण्याचे प्रमाण वाढत असल्याने त्या प्रदेशातील लोकांनाही पर्यावरणीय धोका निर्माण झाला आहे, असेही या अहवालात म्हटले आहे.