येळकोट, येळकोटच्या जयघोषाने जेजुरी गड दुमदुमला
जेजुरी (वार्ताहर) – जेजुरी गडावर पारंपरिक मानाच्या शिखरकाठीच्या देवभेटीचा अवर्णनीय सोहळा सोमवारी (दि. 10) मोठ्या जल्लोषात पार पडला. दरवर्षीप्रमाणे यंदाही सुप्याचे खैरे, संगमनेरचे होलम, जेजुरीचे होळकर यांच्याबरोबर सुमारे 50 प्रासादिक काठ्या या उत्सवात सहभागी झाले होते. तर हा सोहळा नजरेत साठवण्यासाठी हजारो भाविक गडावर उपस्थित होते. यावेळी “येळकोट येळकोट जय मल्हार’ अखंड जयघोष करीत हजारो भक्त वाद्यवृंदाचा तालावर नाचत होते. पिवळ्याधमक भंडाऱ्याची मुक्त उधळण झाल्याने सारा गड सोनेरी झाला होता. यावेळी भाविकांच्या आनंदाला उधाण आले होते.
माघ पौर्णिमेला कोळी बांधवांच्या पालख्यांचा सोहळा दरवर्षी रंगतो. तर पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी शिखराला काठी टेकविण्याचा मानाचा कार्यक्रम असतो. सुप्याचे खैरे, संगमनेरचे होलम व जेजुरीचे होळकर हे प्रमुख मानकरी तर इतर काही अनेक गावच्या प्रासादिक काठ्या या यात्रेत सहभागी होतात. होलम व खैरे यांच्यामध्ये यापूर्वी मानावरून वाद झाल्याने ही यात्रा दरवर्षी दोनवेळा भरते. दरवर्षी दोन्ही काठ्यांना आलटून पालटून मान दिला जातो.
यंदा सकाळच्यावेळी काठी टेकविण्याचा मान खैरे काठीचा होता, त्यानुसार सकाळी नऊ वाजता खैरे यांची काठीने गडावर जाण्यासाठी प्रस्थान ठेवले. होळकर वाडा, छत्री मंदिर, मारुती मंदिराचा मान घेत काठी गडावर आली. साडेअकरा वाजता गडावर शिखराला काठी टेकली. त्यांच्याबरोबर आठ ते दहा प्रासादिक काठ्या होत्या. त्याही टेकविण्यात आल्या, नंतर वाद्याच्या गजरात एकच जल्लोष झाला.
मंदिर प्रदक्षिणा घेत काठ्यांची मंदिराभोवताली मिरवणूक पार पडली. त्यानंतर दुपारी एक वाजता संगमनेरचे होलम गडाकडेकडे मार्गस्थ झाले. होळकर वाडा, मारुती मंदिर, मान घेऊन साडेचार वाजता काठी गडावर आली. खंडोबाचा जयघोष करित पारंपरिक वाद्याच्या गजरात काठी शिखराला टेकली, त्यावेळी एकच जल्लोष करण्यात आला.
संगमनेरबरोबर प्रसादिक काठ्या होत्या. त्यांनीही काठ्या टेकवित नंतर मंदिर प्रदक्षिणा केली. मार्तंड देवसंस्थानच्या वतीने तुकाराम काटे, अरुण पुंड, अमोल भरीतकर, विजय गुंजाळ, वैभव गुंजाळ, निलेश गुंजाळ, बाळासाहेब काळे, निवृत्ती लांडगे आदी आठ ते दहा जणांचा सन्मान करण्यात आला.मार्तंड देवसंस्थानचे मुख्य विश्वस्त ऍड. अशोक संकपाळ, विश्वस्त संदीप जगताप, विश्वस्त पंकज निकुडे यांच्या हस्ते काठी प्रमुखांचा सत्कार करण्यात आला. यात्रेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.