देशी गुलाबापासून बनविले उच्च प्रतीचे गुलकंद ; 40 वर्षे पडून असलेल्या दहा गुंठे क्षेत्राचा वापर
दीपक येडवे
वीसगाव खोरे – रावडी (ता. भोर) येथील वर्षा आणि विश्वास हरी जोशी या उभयतांनी करोना संकटाकडे एक संधी म्हणून पाहत उराशी बाळगलेले स्वप्न साकारत घरगुती देशी गुलाबांपासून गुलकंद निर्मिती उद्योग सुरू केला.
जोशी यांची आई गुलाबापासून पाट्या-वरवंट्यावर वाटलेला गुलकंद बनवत असे. हा गुलकंद बनविण्याची कृती जोशी यांना माहीत होती ती पत्नीच्या साथीनं करोना काळात कुटीर उद्योगाची उगमस्थान ठरली. दहा गुंठे क्षेत्र जवळपास 40 वर्षे पडून होते. ते जेसीबीच्या साहाय्याने समतल करून लागवडीयोग्य बनविले. अतिघन तंत्रज्ञानाने आंबा लागवड करत असताना मधल्या सरीवर घराजवळील देशी गुलाबाची झुडपे छाटून साडेतीनशे गुलाबांचे छाट लावले.
बागेला विहीरीच्या सहाय्याने पाणी पुरवठा होत असून, हिवाळ्यात दर आठ दिवसांनी व उन्हाळ्यात दर पाच सहा दिवसांनी पाणी देत आहे. वर्षातून दोनवेळा छाटणी केली जाते. किडीचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून फवारणी तसेच चिकट पॅड लावल्याने किडे, पाखरे यांना आळा बसतो आहे. उन्हाळ्यात झाडांना अधिक फुटवा व अधिक फुले येवू लागल्याने या फुलांचे करायचे काय यातून गुलकंद बनविण्यास सुरुवात झाली.
वर्षाकाठी मागणीनुसार साधी साखर, खडीसाखर, खांडसरी साखरेचा मिळून पाचशे किलो गुलकंद तयार करून विक्री केली जाते. 300 ते 400 रुपये प्रतिकिलो दर मिळतो. आधी फक्त नातेवाईक, ओळखीच्यांमध्ये विक्री केली. गुलाब अर्क, खाद्य वस्तूंसाठी सुकी पाकळी आणि मिक्स ड्रायफ्रूट गुलकंद बनवण्याचा मानस आहे.
– वर्षा जोशी, विश्वास जोशी, प्रगतशील शेतकरी, रावडी (ता.भोर)
दीड टन कांदा पीकही घेतले
या पिकांबरोबरच कांद्याचे पीक घेतले यात दीड टन कांद्याचे उत्पादन झाले. यातून फुलशेतीचा पायाभूत खर्च निघाला.
खत व्यवस्थापन
सेंद्रिय खतामध्ये निंबोळी पेंड, करंजी पेंड, कोंबडी खत, बकरी लेंढी खत याचा डोस वर्षातून दोन वेळा प्रती झाड 250 ग्रॅम प्रमाणे दिला जातो. सुफला, महाधन, मिश्रखत हे 100 ग्रॅम दर सहा महिन्यांनी दिले जाते.