मुंबई – एकनाथ शिंदे यांच्या गटानं 34 आमदारांच्या सहीचं एक पत्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना लिहिलं आहे. त्यात एकनाथ शिंदे यांना गटनेता तर भरत गोगावले यांना प्रतोद म्हणून नेमण्याची शिफारस करण्यात आली आहे. मात्र असं कुठलंही पत्र आपल्याला प्राप्त झालेलं नसल्याचं झिरवळ यांनी सांगितलं आहे. आता झिरवळच नॉट रिचेबल असल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान नॉट रिचेबल होण्यापूर्वी झिरवळ यांनी शिवसेनेच्या अजय चौधरी यांना गटनेता आणि सुनील प्रभू यांना प्रतोद म्हणून नेमण्याचं पत्र मिळाल्याचं स्पष्ट करत त्यांची नियुक्ती केल्याचं सांगितलं होतं.
चौधरी यांची नियुक्ती केल्याचं स्पष्ट केल्यानंतर झिरवळ नॉट रिचेबल असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे सध्या तरी शिवसेना तंत्रशुद्ध पद्धतीने बंड मोडून काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर शिंदे गटाकडून यावर काय तोडगा निघणार हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.
दुसरीकडे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आपले मुख्यमंत्रीपद अमान्य असणं ही राक्षसी महत्वाकांक्षा असल्याचे ते म्हणाले.
विठ्ठल आणि बडव्यांवर जे बोलतायत त्यांचा मुलगा खासदार असल्याची टीकाही उद्धव यांनी केली आहे. शिवसेनेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना निष्ठा काय असते ते दाखवून द्यावे लागेल असे ते म्हणाले. आहे.