कोलंबो :- आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताकडून पराभूत झालेले दोन्ही संघ पाकिस्तान व श्रीलंका यांच्यासाठी आज(दुपारी ३ वाजता) याच संघात होत असलेला सामना अत्यंत निर्णायक ठरणार आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल तो अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल व रविवारी त्यांचा विजेतेपदासाठी भारताशी सामना होणार आहे.
पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याचा टॉस दुपारी 2.30 ला होणार होता,मात्र पावसामुळे अद्याप टॉस होऊ शकलेला नाही. सकाळपासून कोलंबोतील हवामान खराब झाले असून सततच्या पावसामुळे मैदान पूर्णपणे झाकले गेले आहे.
काही वेळ हवामान साफ झाले होतेे आणि पाऊसही थांबला होता,त्यामुळे टॉसची
तयारी देखील पूर्ण झाली होती आणि 2.45 ते 3 दरम्यान टॉस होणार होता पण त्याचवेळी पुन्हा पाऊस आला. त्यामुळे नाणेफेकीला(Toss) आणखी विलंब होणार आहे.
दरम्यान, सुपर फोर गटात भारतीय संघाने पाकिस्तान व श्रीलंका या दोन्ही संघांना पराभूत करत थाटात अंतिम फेरी गाठली आहे. दुसरीकडे पाकिस्तान व श्रीलंका या दोन्ही संघांनी बांगलादेशचा पराभव केल्यामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपूष्टात आले आहे. आता आज होत असलेल्या पाकिस्तान व श्रीलंका या सामन्याला जणू उपांत्य फेरीचेच स्वरुप आले आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना येत्या रविवारी होणार आहे.
श्रीलंका संघाने सुपर फोरच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशचा पराभव केला होता. पाकिस्तान संघानेही पहिल्या सामन्यात बांगलादेशचा पराभव केला आणि नंतर या दोन्ही संघांना भारतीय संघाकडून पराभव पत्करावा लागला.