सातारा – करोना विषाणूचा भयावह फैलाव झालेल्या चीनमधील वुहानमध्ये अडकलेल्या साताऱ्याच्या अश्विनी पाटील अखेर 17 दिवसांनी 70 ते 80 भारतीयांसमवेत आज मायदेशात परतल्या. मी 10 फेब्रुवारीपासून देशवासीयांना सोशल मीडियातून साद घालत होते. माझ्या हाकेला प्रतिसाद मिळाला आणि मी अन्य देशवासीयांसोबत मायदेशात परतलो आहोत, अशी भावनिक प्रतिक्रिया अश्विनी पाटील यांनी दिली.
चीनमधील करोना विषाणूशी लढा देण्यासाठी भारतीय वायूसेनेचे सी-17 ग्लोबमास्टर या विमानातून वैद्यकीय मदत वुहानमध्ये काल पाठवले. तेथे अडकलेले भारतीय याच विमानाने गुरुवारी सकाळी दिल्लीत परतले. त्यामध्ये मूळच्या साताऱ्याच्या अश्विनी पाटील यांचा समावेश आहे.
इंडो-तिबेट सीमा पोलिसांच्या वैद्यकीय शिबिरात सर्वांची तपासणी करूनच त्यांचा अहवाल दिला जाणार आहे, याला अश्विनी पाटील यांनी दुजोरा दिला. करोनाचा फैलाव सुरू झाल्यापासून चीनमध्ये अडकलेल्या माझ्यासह अन्य देशवासीयांना आपण जे धैर्य दिले, ते आम्ही आयुष्यभर विसरू शकणार नाही, असे अश्विनी पाटील म्हणाल्या.
अश्विनी यांचे पती उपचारासाठी पोलंडला रवाना झाले होते. एकीकडे करोनाचा भयवाह फैलाव आणि दुसरीकडे मायदेशी परतण्याची आतुरता होती; परंतु त्यातून मार्ग निघत नव्हता. अखेरीस अश्विनीने 10 फेब्रुवारीला सकाळी एका व्हिडिओच्या
माध्यमातून भारत सरकारकडे मदतीची अपेक्षा व्यक्त केली. त्यानंतर एका वृत्तवाहिनीस दिलेल्या मुलाखतीत तिने चीन आणि भारत सरकार करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यात कमी पडत नसल्याचे स्पष्ट केले होते. 25 मिनिटांच्या मुलाखतीत तिने वूहानमधील भयावाह परिस्थिती कथन केली. त्यातूनही आपण सुरक्षित असल्याची खात्री दिली होती.
तिने मदतीची अपेक्षा व्यक्त केल्यानंतर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आ. पृथ्वीराज चव्हाण, खा. श्रीनिवास पाटील, माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी वुहानमधील भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. ते सातत्याने केंद्र सरकारच्या संपर्कात राहिले. आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी वुहानमधील भारतीय दूतावासाशी सातत्याने संपर्क ठेवून भारतीयांना पाठबळ देत राहिले. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. दरम्यान, वुहानमधून परतलेले सर्व भारतीयांना आयटीबीपीच्या आरोग्य केंद्रात डॉक्टरांच्या निगराणीखाली 15 दिवस ठेवण्यात येणार आहे.