पुणे :- महापालिकेकडून शहरातील पाणी नियोजनासाठी वडगाव जलशुध्दीकरण केंद्रातून सिंहगड रस्ता आणि कात्रज भागात सोमवार ते रविवार पर्यंत दरारोज वेगवेगळया भागात पाणी पुरवठा केला जातो. मात्र, सोमवारी शहरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा येत असून या वारी सोहळयातील बहुतांश दिंडया विठ्ठलवाडी, हिंगणे ( खुर्द), माणिकबाग, सनसिटी रस्ता, वडगाव परिसरात मुक्कामी असतात.
या शिवाय, प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे विठ्ठल मंदीरही असून या मंदीरातही हजारो वारकरी दर्शनासाठी येतात. मात्र, सोमवारीच पाणी बंद असल्याने भाविक तसेच वारकऱ्यांना मोठया गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे सोमवार तसेच मंगळवार या दोन्ही दिवशीचा पाणी बंद या आठवडयात रद्द करावा अशी मागणी माजी नगरसेविका मंजूषा नागपूरे यांनी महापालिका आयुक्तांसह, पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
दिंडयासाठी पाण्याची गरज
दरम्यान, सिंहगड रस्ता परिसरात अनेक दिंडया मुक्कामी असतात, दिंडीत असलेल्या वारकऱ्यांना दैनंदिन वापरासाठी मोठया प्रमाणात पाण्याची गरज भासते. अशा स्थितीत पाणी बंद असल्याने तसेच शहरात पालखी सोहळा असल्याने टॅंकरचे पाणी मिळण्यासाठीही अडचणीत येतात अशा स्थितीत पाणी नसल्यास वारकऱ्यांची अडचण होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन हा पाणी बंद मागे घ्यावा अशी आमची आयुक्तांना विनंती असल्याचे नागपूरे यांनी सांगितले.