पंढरपूर : पुढील आठवड्यात असणाऱ्या आषाढी एकादशीला लाखो वारकरी आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल होत आहेत. याच एकादशीनिमित्त शिंदे-फडणवीस सरकारकडून वारकऱ्यांसाठी खुशखबर देण्यात आली आहे. एकादशी दिवशी विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा सूरू असतानाही वारकऱ्यांसाठी मुखदर्शन सुरूच राहणार असल्याचा महत्वाचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाचे वारकऱ्यांकडून स्वागत करण्यात आले आहे.
शासकीय महापूजेच्या चार तासांपूर्वीच दर्शनाची रांग बंद करण्यात यायची. त्यामुळे वारकऱ्यांमोठी मोठी गैरसोय व्हायची. कारण रांगेतला कालावधी चार तासांनी वाढायचा. वारकऱ्यांची ही गैरसोय टाळण्यासाठी यंदा हा निर्णय घेण्यात आला आहे. पालकमंत्री विखे पाटील यांनी रात्री बैठकीत दिले आहेत. आषाढी एकादशीला मुख्यमंत्री पहाटे अडीच वाजता पूजेला येत असतात आणि जवळपास पहाटे पाचपर्यंत विठ्ठल रुक्मिणीची शासकीय पूजा आणि सत्कार कार्यक्रम मंदिरात होत असतो. यावेळी आषाढी सोहळ्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी व्यवस्था केल्याने पर्वणी काळात जवळपास दीड ते दोन लाख भाविकांना देवाचे मुखदर्शन होणार आहे.
आषाढी एकादशी हा सोहळ्यातील पर्वणीच दिवस असतो. यादिवशी दर्शन मिळावे राज्यभरातील आमदार, खासदार, मंत्री, अधिकारी आणि त्यांचे कार्यकर्ते व्हीआयपी बनून दर्शन घेण्यासाठी गर्दी करीत असतात. त्यामुळे रांगेतील शेकडो भाविकांना या पवित्र दिवशी दर्शनापासून मुकावे लागते. हे सर्व प्रकार थांबावेत यासाठी धाडसी निर्णय घेत आषाढी एकादशीला शासकीय पूजेवेळी मुखदर्शन देण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयाचे वारकरी संप्रदायातून जोरदार स्वागत होत आहे. आषाढी यात्रेला आलेल्या जास्तीत जास्त भाविकांना एकादशी दिवशी दर्शन देण्यासाठी झालेला हा निर्णय यात्रेच्या इतिहासात पहिल्यांदाच घेण्यात आला आहे. यामुळे एकादशी दिवशी दिवसभर दर्शनासाठी घुसखोरी करणाऱ्या तथाकथित राजकारण्यांना मात्र चांगलाच चाप बसणार आहे. आषाढी एकादशीला व्हीआयपी बंदीची संपूर्ण व्यवस्था पोलिसांच्या ताब्यात दिली जाणार असल्याने मंदिर प्रशासन देखील यात हस्तक्षेप करू शकणार नाही.