मुंबई – राज्यातील रस्त्यांचे जाळे विकसित झाले, तर आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. हे ओळखून अथक प्रयत्नानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली “हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’चे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. तेव्हा पासूनच हा महामार्ग सतत चर्चेत येत आहे. त्याच कारण देखील तितकंच खास आहे, आणि ते म्हणजे समृद्धी महार्गावर होणारे मोठ्या प्रमाणात अपघात.
समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील नागपूर ते शिर्डी (कोकमठाण) या 520 किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. तर उर्वरित शिर्डी ते मुंबई हा रस्ता जुलै 2023 पर्यंत खुला करण्यात येणार आहे. या महामार्गामध्ये राज्यातील दहा जिल्हे, 26 तालुके आणि 392 गावांचा समावेश असून, सहापदरी असलेल्या या महामार्गाची लांबी 701 किलोमीटर आहे.
दरम्यान, आता पहिल्या टप्प्याचं लोकार्पण झालं असून, हा महामार्ग प्रवासी नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात या मार्गावरून प्रवास करताना दिसून येत आहे. अश्यातच, आज पासून या महामार्गावर टायर तपासणी करूनच वाहने सोडली जाणार आहेत.
यासाठी शिर्डी इंटरचेंजवर वाहन तपासणी केंद्राचे उद्घाटन झाले आहे. टायर खराब असल्यास समृद्धी महामार्गावर प्रवेश दिला जाणार नसल्याची माहिती परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी दिली. त्यामुळे आता यापुढे समृद्धी महार्गावर प्रवास करताना वाहनचालकांना आपल्या गाडीचे टायर चेक करावे लागणार हे नक्की.
तपासणी केंद्रावर वाहनांची मोफत टायर तपासणी होणार आहे. सध्या शिर्डी व नागपूर या दोन ठिकाणी टायर तपासणी केंद्रांची उभारणी केली गेली आहे. टायर तपासणी केंद्रावर नायट्रोजन भरणे, बेसिक एअर फिलिंग, टायर वेअर तपासणी, वॉल्व तपासणी, वॉल्व पीन चेक आणि रिप्लेसमेंट, बेसिक पंक्चर दुरुस्ती, टायर वेअर चेक इत्यादी तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत.