वाराणसी – ज्ञानवापी संकुलातील व्यासजींच्या तळघरात ३० वर्षांनंतर पूजेला न्यायालयाने परवानगी दिली. या आदेशानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा कडेकोट बंदोबस्तात तळघरात पूजा सुरू केली. गुरुवारी पहाटे मंगलारतीही झाली. यावेळी एखाद्या महाआरतीसारखे वातावरण होते.
जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांच्या न्यायालयाने बुधवारी दिलेल्या आदेशात सांगितले की, व्यासजींच्या तळघरात असलेल्या मूर्तींचे पूजन राग-भोग व्यास परिवार आणि काशी विश्वनाथ ट्रस्ट बोर्डाचे पुजारी यांनी करावे.
जिल्हा न्यायाधीशांनी आपल्या आदेशात लिहिले आहे की, राग-भोग पूजन केलेल्या चौक पोलिस स्टेशन हद्दीतील सेटलमेंट प्लॉट क्रमांक 9130 मध्ये असलेल्या इमारतीच्या दक्षिण बाजूला असलेल्या तळघरात असलेल्या मूर्ती प्राप्त करून घेण्याचे निर्देश प्राप्त जिल्हा दंडाधिकारी यांना आहेत.
सोबतच या संदर्भात रिसिव्हरने सात दिवसांत लोखंडी कुंपणाची योग्य व्यवस्था करावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने या प्रकरणाच्या पुढील सुनावणीची तारीख ८ फेब्रुवारी दिली आहे. दरम्यान, वादी आणि प्रतिवादी पक्ष आपले आक्षेप मांडू शकतात. त्याचबरोबर न्यायालयाच्या निर्णयावर नेत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दुसरीकडे, राज्यसभा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी म्हटले आहे की, ज्ञानवापी आणि कृष्णजन्मभूमीच्या जीर्णोद्धारासंदर्भातील जनहित याचिका त्वरित सूचीबद्ध करण्याची विनंती करण्यासाठी मी आता सर्वोच्च न्यायालयात जाईन. वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशांसमोर अर्ज दाखल करून आम्हीही या खटल्यात पक्षकार होण्याचा निर्णय घेतला आहे.
असदुद्दीन ओवेसी संतापले
ज्ञानवापीमध्ये पूजेची सवलत देण्याबबातचा निकाल देणाऱ्या न्यायमूर्तींचा काल निवृत्तीचा दिवस होता. १७ जानेवारी रोजी त्यांनी जिल्हा दंडाधिकारी यांची रिसीव्हर म्हणून नियुक्ती केली होती. आता तुम्ही तळघरात पूजा करण्याचा अधिकार देऊन संपूर्ण प्रकरण निकाली काढले आहे. १९९३ पासून तिथे काहीही होत नव्हते, पण आता तुम्ही पूजा करण्याचा अधिकार दिला आहे. हा उपासना कायद्याचे उघड उल्लंघन आहे, हा चुकीचा निर्णय आहे. यामुळे ६ डिसेंबरची पुन्हा पुनरावृत्ती होऊ शकते. राममंदिर खटल्याचा निकाल देताना आम्ही श्रद्धेच्या आधारावर निकाल दिल्याचे सांगितले होते.