कराची – बलुचिस्तानमध्ये सोमवारपासून 3 वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईमध्ये 21 दहशतवादी ठार झाले आहेत. बलुचिस्तानमध्ये झालेल्या हल्ल्यांमध्ये माच गावातील तुरुंगावर झालेल्या सशस्त्र हल्ल्याचाही समावेश आहे, असे सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले.
माचमधील तुरुंग आणि कोलपूर येथील तळावर झालेल्या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात मोठी मोहिम उघडली आहे.
इंटर सर्व्हिस पब्लिक रिलेशनने मात्र चकमकीमध्ये 4 सुरक्षा कर्मचार् यांसह 12 दहशतवादी मारले गेले असल्याचे म्हटले आहे. हे दहशतवादी बलुच लिबरेशन आर्मीशी मुजाहिद ब्रिगेडशी संबंधित होते आणि या मोहिमेत आतापर्यंत 21 दहशतवादी मारले गेले आहेत, असे सुरक्षा अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. मात्र त्यांची नावे जाहीर केली गेलेली नाहीत.
ठार झालेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असण्याची शक्यता असल्याचेही या अधिकाऱ्याने म्हटले आहे. कारवाईमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये माच आणि कोलपूरवर हल्ला करणार् या आत्मघातकी हल्लेखोरांचाही समावेश होता. माच आणि कोलपूरवरील हल्ल्यानंतर डोंगरात पळून गेलेल्या दहशतवाद्यांना शोधून संपवण्याची कारवाई अंतिम टप्प्यात असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.